वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने नागरिक त्रस्त; पनवेलच्या प्रश्नांवर मंत्रालयात खलबतं
महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा विद्युत विभागाच्या मंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर,आमदार महेश बालदी, महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, मंडल अध्यक्ष, नगरसेवक तसेच विद्युत विभाग आणि महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
MNS Protest : ‘सात दिवसांत नाले साफ करा’; कुर्ल्यात मनसे आक्रमक, जनआंदोलनाचा इशारा
बैठकीत पनवेल महानगरपालिका हद्दीतील तसेच पनवेल ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याच्या समस्या, वारंवार होणारी वीज खंडिती, अपुरी यंत्रणा, वाढलेला वीज भार आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींबाबत लोकप्रतिनिधींनी सविस्तर माहिती दिली. नागरिकांच्या व्यथा आणि स्थानिक पातळीवरील समस्यांचे वास्तव चित्र मंत्री महोदयांसमोर मांडण्यात आले.
यावेळी राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विद्युत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत पनवेलमधील वीज समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. ज्या ठिकाणी भूमिगत (अंडरग्राउंड) केबलची आवश्यकता आहे तेथे त्वरित केबल टाकण्यात याव्यात, ज्या भागात नवीन ट्रान्सफॉर्मरची गरज आहे तेथे तातडीने ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावेत तसेच आवश्यक साहित्य आणि निधी उपलब्ध करून देताना कोणत्याही प्रकारची कमतरता ठेवू नये, अशा सूचना त्यांनी दिल्या.
पनवेलकरांना अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात याव्यात आणि नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात, असेही आदेश बैठकीत देण्यात आले.
या बैठकीमुळे पनवेल शहर व ग्रामीण भागातील वीज समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, कळंबोलीतील विविध सेक्टरमध्ये वारंवार होणाऱ्या केबल फॉल्टमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या बिघाडामुळे सेक्टर 14 आणि सेक्टर 5 ई मधील तब्बल दहा तास वीजपुरवठा खंडित राहिला. यामुळे परिसरातील हजारो नागरिकांना उकाड्यात रात्र जागून काढावी लागली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून महावितरणने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.






