राज्यातील धरणसाठ्यात तब्बल 14 टक्क्यांची तूट; 43.70 टक्के उपयुक्त पाणीसाठा
मुंबई : मुंबई महानगरासह पुणे, नाशिक आणि रायगड पट्ट्यातील अतिवृष्टीने जलसाठ्यात किंचित वाढ झाली असली तरी राज्यातील बहुतांश भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यातच गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्याच्या विविध भागातील पाणीसाठा कमीच आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा एकूण ३ हजार २९ धरणांमध्ये ४३.७० टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ५७.७३ टक्के होता.
गेल्यावर्षीच्या तुलनेत ही घट १४ टक्के आहे. राज्यातील मोठ्या प्रकल्पांचा विचार केला असता १३८ मोठ्या धरणांमध्ये ४७.२५ टक्के, मध्यम प्रकल्पांमध्ये ४१.७२ टक्के, तर लघु प्रकल्पांमध्ये २८.५९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. कोकणातील मोठ्या धरणांमध्ये जवळपास ६० टक्के, मध्यम प्रकल्पांमध्ये ७२.५५ टक्के पाणीसाठा आहे. पुणे विभागातील मोठ्या धरणांमध्ये ५३.५९ टक्के साठा नोंदविण्यात आला आहे. मात्र, मराठवाड्यातील अनेक मोठे आणि लघु प्रकल्प अजूनही क्षमतेच्या निम्म्यापेक्षाही कमी भरले आहेत.
राज्यातील प्रमुख धरणांमध्ये पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण शंभर टक्के भरले असून, येडगाव, चासकमान, भामा आसखेड, वडज यांसारख्या धरणांतील साठाही लक्षणीय वाढला आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात सुमारे ४८.८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हवामान विभागाने काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्याच्या विविध भागांत पावसाची शक्यता वर्तविली आहे. या महिन्यात आणखी काही दिवस जोरदार सरी कोसळल्यास जुलैअखेरपर्यंत धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
येरळवाडी धरणात मृत पाणी साठा शिल्लक
मागील वर्षी जून महिन्यात तूफान पर्जन्यवृष्टी झाली होती. त्यावेळी सर्व नद्या, तलाव पाण्याने संपूर्ण भरून गेले होते. यावर्षी मात्र जून महिना काही अपवाद वगळता कोरडा गेला आणि आता तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी कमतरता भासू लागली आहे. कधी काळी दुष्काळी खटाव तालुका म्हटलं जायचं. ते आता मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रयत्नातून उरमोडी, तारळी, टेम्बूचं पाणी आल्यामुळे दुष्काळी कलंक पुसत चालला आहे.
येरळवाडी धरणात फक्त 25 टक्के मृत पाणी साठा शिल्लक; वडूजसह अनेक गावांचा पाणी प्रश्न ऐरणीवर






