पुण्यात पावसाने विश्रांती घेताच उकाड्यात झाली वाढ
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामादरम्यान दरवर्षी पावसाची हजेरी लागते. मात्र, यंदा पालखी पुण्यात मुक्कामी असताना पावसाने विश्रांती घेतली आहे. गुरुवारपासून गायब झालेला पाऊस शुक्रवारीही (ता.१०) पडला नाही. दुपारच्या सुमारास आकाश ढगाळ झाल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, पावसाने हजेरी न लावल्याने पालखी दर्शनासाठी आलेले नागरिक आणि मुक्कामी असलेले वारकरी सुखावले. शनिवारीही साधारणत: अशीच परिस्थिती पाहिला मिळाली.
पुण्यात शनिवारी पावसाने दडी मारल्याचे दिसून आले. वातावरणात बदल पाहिला मिळाला असून, उकाड्यात वाढ झाली. पुणे शहर आणि परिसरात शुक्रवारी कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात आली. शहराचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. आकाशात ढगाळ वातावरण असतानाही उन्हाचा चटका जाणवत असल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला.
हवामानशास्त्र विभागाने अंदाज वर्तवला होता. त्यात शनिवारी (ता.११) शहरातील किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर राहण्याचा अंदाज असून, किमान तापमान २४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते अतिहलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण, दुपारपर्यंत पावसाची चिन्हे दिसून आली नाहीत. दरम्यान, रविवारनंतर पुणे शहरातील तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता असून, काही ठिकाणी अतिहलक्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
वर्ध्यात नदीकाठच्या २९३ गावांवर पुराचे सावट
दुसरीकडे, मान्सूनच्या तोंडावर वर्धा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. जिल्ह्यातील २९३ गावे नदीकाठावर असून त्यापैकी २७ गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी बचाव पथके, बोटी, जीवनरक्षक साहित्य तसेच नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






