मुंबई- मुंबई ते गोवा (Mumbai to Goa) या मार्गावर आजपासून सुरु होणाऱ्या वंदे भारत रेल्वेचं ( Vande Bharat Express) उद्घाटन आता लांबणीवर पडलं आहे. ओडिशात कोरोमंडल एक्सप्रेससह ३ रेल्वेंत झालेल्या भीषण अपघातानंतर ( Railway Accident)आजचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची घोषणा कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ओडिशाच्या अपघातात 233 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 900 हून अधिक जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ओडिशात हा अपघात झालाय. त्यानंतर शनिवारी ओडिशात एक दिवसांचा दुखवटा पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वे मंत्रालयानंही शनिवारचे महत्त्वाचे कार्य़क्रम रद्द केल्याची माहिती आहे. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आजच्या मुंबई- गोवा वंदे भारत एक्सप्रेसचा कार्यक्रम होणार नसल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितल्याची माहिती आहे. वंदे भारत एक्सप्रेस आता कधी सुरु होईल, याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
Flagging off function of the Goa-Mumbai Vande Bharat Express cancelled after the horrific train mishap in Odisha’s Balasore: Konkan Railway Official
— ANI (@ANI) June 2, 2023
तेजस एक्सप्रेसपेक्षा गतीनं धावणाऱ्या मुंबई
-गोवा वंदे भारत ट्रेनकडे सगळ्याचं लक्ष आहे. ही एक्सप्रेस सेवा 3 जूनपासून सुरु होणार होती, मात्र आता त्याची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी शक्यता आहे. आठ कोचच्या या ट्रेनचे 11 थांबे असणार आहेत. 586 किलोमीटरचं अंतर ही रेल्वे अवघ्या 7 तास 50 मिनिटांत पार करणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात दरड पडण्याचे प्रकार सातत्यानं घडतात. अशा स्थितीत पावसाच्या स्थितीत या वंदे भारत एक्सप्रेसच्या गतीवर काही निर्बंध येण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय. साधारणपणे ही ट्रेन ५८६ किलोमीटर अंतर कापण्यासाठी ७ तास ५० मिनिटांचा वेळ घेणार आहे.
रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार वगळता इतर सर्व दिवशी वंदे भारत एक्सप्रेस मुंबई-गोवा मार्गावर धावेल. मुंबई- गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे ८ स्टॉप असतील. त्यात मुंबई, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिवीम आणि मडगाव यांचा समावेश आहे. शुक्रवारी गाडीचा मेन्टेनन्स करण्यात येईल.