संग्रहित फोटो
नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा ज्या पद्धतीने उल्लेख केला तो अत्यंत आक्षेपार्ह आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर नाव घेण्याची फॅशनच आली आहे. एवढ्यावेळा देवाचे नाव घेतले तर देव पावला असता असे वक्तव्य केले. अमित शाह यांच्या या विधानातून भाजपाला देशाच्या संविधान निमार्त्याबद्दल किती राग आहे तेच बाहेर आले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा भाजपाचा खरा चेहरा जनतेच्या समोर आला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या विधानाचा काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना जगण्याचा, व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला, त्यामुळेच आपण सर्वजण स्वाभिमानाने आपल्या देशात नांदत आहोत. भारतीय जनता पक्षाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जी खदखद आहे तीच त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली आहे. अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याने त्यांनी देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली.
हे सुद्धा वाचा : पुणे हादरलं! नृत्य प्रशिक्षकाचा चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार, पालक संतप्त
विरोधी पक्षनेते पदाबद्दल विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील.
विधानसभा अध्यक्ष व विधान परिषद सभापती यांची निवड बिनविरोध करण्याची परंपरा महाराष्ट्रात राहिली आहे. विधानसभेचा उपाध्यक्ष, परिषदेचा उपसभापती विरोधी पक्षांचा करण्याची परंपरा आहे ती खंडीत झालेली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे भूमिका मांडली आहे व ते याबाबत सकारात्मक आहेत. सभागृह चालवण्यासाठी विरोधी पक्षनेता नाही अशी व्यवस्था योग्य नाही. शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेता असला पाहिजे, त्यावर विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मंगळवारी १७ डिसेंबर रोजी राज्यसभेत संविधानावरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसला चांगलेच घेरले. त्यावेळी अमित शाह यांनी काँग्रेस आता आंबडेकर, आंबेडकर असा घोषा लावत आहे. एवढे जप जर देवाचा केला असता तर स्वर्ग मिळाला असता असे वक्तव्य केले. शाह पुढे म्हणाले की काँग्रेसला आंबेडकर यांचे नाव घेण्याची जास्त गरज आहे. परंतू जनतेला त्यांचा खरा इरादा माहिती आहे.
अमित शाह यांच्या वक्तव्याला काँग्रेसने आंबेडकर यांचा अपमान म्हटले आहे. मल्लिकार्जून खरगे यांच्यापासून राहुल गांधीपर्यंत सर्वांनी या मुद्द्याला उचलले आणि हा दलितांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. शाह यांचे वक्तव्य आणि संपूर्ण प्रकरणाला राहुल गांधी यांनी मनुस्मृती आणि आरएसएसशी जोडले आहे.