किनवट रेल्वे स्थानकावर एक बेवारस मुलगा 13 वर्षांपासून राहतो त्याला ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे (फोटो - सोशल मीडिया)
Nanded News : कचरू जोशी : किनवट : किनवट रेल्वे स्थानकावर गेल्या तेरा वर्षापासून एक मुलगा वास्तव्य करत आहे. त्याला ना नाव, ना गाव, ना आई-वडील, ना जात-धर्म अशी कोणतीही ओळख नाही. स्थानकावर (Railway News) नियमित येणाऱ्या प्रवाशांनी व स्थानिक नागरिकांनी त्याला आदिलाबाद ते तिरुपती दरम्यान धावणाऱ्या कृष्णा एक्सप्रेस या गाडीचे नाव दिले. तेव्हापासून तो ‘कृष्णा’ या नावाने परिचित आहे. मात्र या कृष्णाची कायदेशीर ओळख निर्माण करण्यासाठी आजवर कोणतीही शासकीय यंत्रणा पुढे आलेली नाही, ही बाब अत्यंत गंभीर असल्याची भावना परिसरातील नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. (Nanded News)
सुमारे तेरा वर्षांपूर्वी वयाच्या तीन ते चार वर्षांत हा मुलगा किनवट रेल्वे स्थानकावर आढळला. तो कोणाचा, कुठून आला, याची कोणालाही माहिती नव्हती. त्याला स्वतःलाही आपले नाव, आई-वडिलांचे नाव वा मूळ गाव यापैकी काहीही सांगता येत नव्हते. त्यामुळे स्थानकावरील नागरिकांनी त्याचा सांभाळ केला आणि समोर उभ्या असलेल्या कृष्णा एक्सप्रेस गाडीच्या नावावरून त्याला ‘कृष्णा’ असे संबोधू लागले. आज तोच कृष्णा अंदाजे पंधरा ते सतरा वर्षांचा तरुण झाला आहे. ज्या वयात मुले शाळेत जाऊन शिक्षण घेतात, घरच्यांच्या मायेत वाढतात, त्याच वयात कृष्णाने स्थानकावरील
भिकाऱ्यांच्या व अपंग व्यक्तींच्या सहवासात दिवस काढले.
हे देखील वाचा :नगरसेवकांना अतिक्रमण हटावचा विरोध ‘अंगलट’! एमआयएमच्या लोकप्रतिनिधींवर अपात्रतेची टांगती तलवार
मूलभूत गोष्टींपासून तो कायमचा वंचित
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तिन्ही ऋतू त्याने उघड्यावर अनुभवले. आई-वडिलांचे प्रेम, शालेय शिक्षण, पोषण आहार व आरोग्य सेवा या सर्व मूलभूत गोष्टीपासून तो कायमचा वंचित राहिला. परिसरातील नागरिक त्याला चागल्या प्रकारे ओळखत असले, तरी त्याची अधिकृत ओळख निर्माण करण्याचे काम आजवर कोणी केले नाही. कृष्णा आता पौगंडावस्थेत आल्याने त्याला पुढील आयुष्य जगण्यासाठी आधार कार्ड, जन्म दाखला, मतदान ओळखपत्र व शैक्षणिक कागदपत्रे यार्च नितांत गरज आहे. मात्र आई-वडील, जात, धर्म व जन्मतारीख यापैकी कोणतीही माहिती उपलब नसल्याने ही कागदपत्रे मिळवणे अत्यंत कठीण बनले आहे.
हे देखील वाचा : सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन अखेर मागे! दोन सुपरवायझर सफाई कामातून दूर
परिणामी शासकीय योजनांचा लाभतर दूरच, त्यांची साधी माहितीही त्याला मिळालेली नाही. कृष्णाची ही परिस्थिती म्हणजे शासकीय यंत्रणांच्या उदासीनतेचे ठळक उदाहरण आहे. शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण, बाल संरक्षण कायदे बाल कल्याण समिती व बाल आयोग या यंत्रणा कार्यरत असताना एक मुलगा तब्बल तेरा वर्षे रेल्वे स्थानकावर उपेक्षित राहतो, हे या सर्व यंत्रणांच्या अपयशाचे निदर्शक आहे. या प्रकरणाची दखल घेत काँग्रेस पक्षाचे ओबीसी विभाग जिल्हा उपाध्यक्ष वसंत राठोड यांनी कृष्णाला कायदेशीर मार्गान कागदपत्रे मिळवून देण्यासाठी उपलब्ध पर्यायांबाबत संबंधित यंत्रणांकडे विचारणा केली आहे. – शासनाने तातडीने पुढाकार घेऊन कृष्णाला कायदेशीर ओळख मिळवून द्यावी, जेणेकरून त्याल एक सामान्य नागरिक म्हणून जगता येईल, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत. या ‘कृष्णा एक्स्प्रेस’ची जीवनगाडी यापुढे तरी योग्य दिशेने धावावी, एवढीच त्यांची अपेक्षा आहे.






