फोटो सौजन्य - Social Media
Mohol News : मोहोळ तालुक्यातील ढोकबाभुळगाव परिसरात उजनी कॅनॉलमध्ये बुडून दोन सख्ख्या-चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. श्रीकांत रोहीताश चोपडा (वय २५) आणि रविकांत हेमराज चोपडा (वय १९) अशी मृत्यू झालेल्या दोन्ही तरुणांची नावे आहेत. हे दोघेही मूळचे राजस्थान राज्यातील झुंझुनु जिल्ह्यातील बडावु गावचे रहिवासी असून, सध्या मोहोळ तालुक्यातील ढोकबाभुळगाव येथे टाईल्स बसविण्याच्या मजुरीच्या कामासाठी आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मे २०२६ रोजी अमावास्येनिमित्त कामाला सुट्टी होती. दुपारच्या वेळी उष्णता वाढल्याने श्रीकांत आणि त्याचा चुलत भाऊ रविकांत हे दोघे उजनी कॅनॉलमध्ये आंघोळीसाठी गेले होते. मात्र, पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने त्यांच्या नातेवाईकांना संशय आला.
यानंतर त्यांचे भाऊ जयसुख चोपडा यांनी कॅनॉल परिसरात जाऊन शोध घेतला असता तेथे दोघांचे कपडे आणि चपला आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस पाटील आणि मोहोळ पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत परिसरात शोधकार्य राबविण्यात आले, मात्र अंधारामुळे दोघांचाही शोध लागला नाही.
रविवार, १७ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या दरम्यान कॅनॉलच्या पाण्यात दोन्ही तरुणांचे मृतदेह तरंगताना दिसून आले. ग्रामस्थ आणि नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय, मोहोळ येथे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांचाही मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेची माहिती जयसुख चोपडा यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी ‘अज्ञात मयत क्र. ६७/२०२६’ अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणात कोणावरही संशय व्यक्त करण्यात आलेला नसून पुढील तपास पोलीस हवालदार पाटील आणि पोलीस नाईक तरटे करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे ढोकबाभुळगाव परिसरात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.






