फोटो सौजन्य - Social Media
मानोरा तालुक्यात हागणदारीमुक्त मोहिमेचा फज्जा उडाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत हद्दींमध्ये आजही ग्रामस्थ उघड्यावर शौचास जात असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकाराकडे संबंधित प्रशासन आणि अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.
‘मेरा भारत, स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत शासनाने हागणदारीमुक्त मोहिम मोठ्या गाजावाजात राबवली होती. उघड्यावर शौचास जाण्याचे प्रकार थांबवण्यासाठी शौचालय बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात अनुदानही देण्यात आले. मात्र अनेक लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष शौचालय न बांधता अनुदानाचा लाभ घेतल्याचे प्रकार यापूर्वी समोर आल्याची चर्चा आहे. त्यामुळे शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासला गेल्याचे बोलले जात आहे.
ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने गावांमध्ये अस्वच्छता आणि दुर्गंधीची समस्या गंभीर बनली आहे. अनेक गावांमध्ये नागरिकांना नाकावर रुमाल ठेवून जावे लागत असल्याचे चित्र आहे. परिणामी, तालुक्यात आरोग्यविषयक समस्या वाढत असून ग्रामस्थांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
मोहिमेच्या सुरुवातीच्या काळात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. मात्र आता ही मोहीम पूर्णपणे थंडबस्त्यात गेल्याचे दिसत आहे. ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी आणि संबंधित विभागांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावरून पुन्हा एकदा प्रभावी हागणदारीमुक्त मोहिम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांत हागणदारीमुक्त मोहिमेंतर्गत किती नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, याचाही लेखाजोखा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावा, अशी मागणी होत आहे. नागरिकांच्या मते, केवळ कागदोपत्री मोहीम न राबवता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देण्याची आवश्यकता आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गावागावात स्वच्छता आणि हागणदारीमुक्त मोहिम प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून जोर धरत आहे.






