सौजन्य - नवराष्ट्र टीम
पाटस : दौंड तालुक्यातील पाटस ग्रामपंचायतीने गावातील प्रमुख चौकाचौकात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे मागील काही महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. लाखो रुपये खर्च करून उभारलेली ही यंत्रणा सध्या धुळ खात पडली असून, यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
गावातील चोरीच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे. त्यातच जुना बाजार परिसरातील आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक चौकातील फलकावर अज्ञातांनी दगडफेक करून तोडफोड केल्याची घटना घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीतही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती न केल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पाटस ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कार्यालय, गाव प्रवेशद्वार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, राजमाता अहिल्याबाई होळकर चौक, उमाजी नाईक चौक तसेच मुख्य रस्ते व विविध नगरांमध्ये एकूण सुमारे ३३ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. मात्र सध्या यापैकी केवळ दोनच कॅमेरे कार्यरत असून उर्वरित कॅमेरे बंद किंवा खराब अवस्थेत आहेत. काही ठिकाणी कॅमेरे तुटून पडलेलेही दिसून येत आहेत.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पाटसची लोकसंख्या ३० ते ३५ हजारांच्या दरम्यान आहे. अष्टविनायक मार्गावर असलेल्या या गावात औद्योगिक वसाहती आणि नागरिकांची वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा अत्यावश्यक ठरत असतानाच तिची दुरवस्था चिंताजनक आहे.
तपासात अडथळे
सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्यामुळे चोरीसह इतर गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना मोठ्या अडचणी येत आहेत. स्थानिक दुकानदारांनी लावलेले कॅमेरे मर्यादित परिसरापुरतेच असल्याने गुन्हेगारांचा माग काढणे कठीण होत आहे. पोलिसांनी वेळोवेळी ग्रामपंचायतीला कॅमेरे सुरू ठेवण्याबाबत सूचना दिल्या असूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.
यासंदर्भात उपसरपंच बाबा कोळेकर यांनी सांगितले की, सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली असून संबंधित एजन्सीला काम देण्यात आले आहे. येत्या दोन दिवसांत सर्व कॅमेरे कार्यान्वित केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वाढती गुन्हेगारी आणि तणावपूर्ण वातावरण लक्षात घेता ग्रामपंचायतीने तातडीने सीसीटीव्ही यंत्रणा दुरुस्त करून कार्यान्वित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






