पीएमपीएल म्हणजे 'बदल्यांचे आगार'; ६ वर्षांत ८ अध्यक्ष बदलले, पंकज देवरे यांची उचलबांगडी
PMPML chairman transfers in last six years: पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आयएएस पंकज देवरे यांची बदली कऱण्यात आली आहे. पंकज देवरे यांच्याकडील अध्यक्षपदाची सुत्रे आता आयएएस महेश आव्हाड यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. लक्षणीय बाब म्हणजे गेल्या सहा वर्षात पीएमपीच्या अध्यक्षपदावर नियुक्त झालेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला आपला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. मागील सहा वर्षात तब्बल आठ अध्यक्षांची नियुक्ती आणि बदली करण्यात आली आहे.
पीएमपीचे विद्यमान अध्यक्ष IAS महेश आव्हाड यापूर्वी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या सीईओपदावर कार्यरत होते. त्या पदावरून बदली करून त्यांच्याकडे आता पीएमपीच्या अध्यक्षपद देण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी जुलै २०२५ मध्ये पंकज भोयर यांना पीएमपीच्या अध्यक्षपदाची सुत्रे देण्यात आली होती. पण अवघ्या ९ महिन्यांतच त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
पीएमपीची कामाची पद्धत, रचना आणि प्रवाशांच्या समस्यांची माहिती करून घेण्यासाठीच अध्यक्षांना काही महिन्यांचा काळ लागतो. पण पंकज देवरे यांच्याकडे पीएमपीची सुत्रे आल्यानंतर काही दिवसांतच पीएमपीच्या काम मोठ्या वेगाने सुरू झाले होते. पण मध्येच कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये अनियमितता झाल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. पण आता त्यांच्या या बदलीमुळेपीएमपीच्या कामाला पुन्हा एकदा ब्रेक लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर अध्यक्ष IAS महेश आव्हाड हे आज (12 मार्च) आपला पदभार स्वीकारणार असल्याचे बोलले जात आहे.
पंकज देवरे यांची उचलबांगडी: मागील वर्षी जुलैच्या मध्यात पंकज देवरे यांनी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडून या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. मात्र, वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली करण्यात आली आहे.
३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यात अडथळे: २०११ मध्ये नियुक्त झालेले आर. एन. जोशी यांचा अपवाद वगळता, गेल्या १९ वर्षांत एकाही अधिकाऱ्याला या पदावर आपला ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. दीपा मुधोळ-मुंडे, पंकज देवरे आणि इतर अनेक अधिकारी पीएमपी परिवहन संस्थेत आपला कार्यकाळ पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत.
पीएमपीएमएलच्या स्थापनेपासूनच्या १९ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत २१ पेक्षा जास्त अध्यक्षांची बदली झाली आहे. पंकज देवरे हे या पदावर बसणारे २२ वे अधिकारी होते, तर आता महेश आव्हाड यांच्या रूपाने संस्थेला २३ वे अध्यक्ष मिळाले आहेत.
राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात पीएमपीच्या स्थितीबाबत चिंताजनक चित्र मांडण्यात आले आहे. बसेसची कमतरता आणि प्रवाशांच्या घटत्या संख्येमुळे ही संस्था आर्थिक संकटात सापडली आहे. वारंवार होणाऱ्या अध्यक्षांच्या बदल्यांमुळे धोरणात्मक निर्णय घेण्यास अडथळे येत असून, त्याचा थेट परिणाम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर होत असल्याचे दिसत आहे.






