सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्गावर सध्या केवळ दोन ते तीन बस थांबे कार्यरत असून, उर्वरित बहुतांश थांबे प्रवाशांसाठी बंद करण्यात आले आहेत. मेट्रोच्या कामामुळे बीआरटी मार्गात मोठे बदल करण्यात आले असून, त्यामुळे सातारा रस्त्यावर वाहतुकीचा गोंधळ वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने योग्य नियोजन करून वाहतूक कोंडी टाळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.
स्वारगेट ते कात्रज मार्गावरील मेट्रोच्या कामामुळे सातारा रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढत असून, पीएमपी बससेवेच्या बदललेल्या मार्गरचनेमुळे भविष्यात मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने योग्य नियोजन करून वाहतुकीचा गोंधळ टाळावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.
पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून स्वारगेट-कात्रज मार्गावर मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. या कामासाठी काही ठिकाणी बीआरटी मार्ग आणि स्थानके हटविण्यात आली आहेत. परिणामी पीएमपी बससेवेमध्ये बदल करण्यात आले असून, काही भागांत बस बीआरटी मार्गातून तर काही भागांत सामान्य रस्त्यावरून चालविण्यात येत आहेत.
पंचमी हॉटेल, भापकर पंप, अरण्येश्वर कॉर्नर, पद्मावती, के. के. मार्केट, बालाजीनगर, भारती विद्यापीठ, कात्रज सर्पोद्यान आणि मोरे बाग परिसरात बीआरटी मार्ग उपलब्ध आहे. मात्र, यातील भारती विद्यापीठ ते कात्रज आणि पंचमी हीच स्थानके सुरू आहेत. त्यामुळे या भागांत बस सर्व्हिस रोड आणि मुख्य रस्त्यावरून धावत आहेत.
प्रत्यक्षात नातूबाग बसथांबा हटविण्यात आला असून, बालाजीनगर, विश्वेश्वर, पद्मावती आणि अरण्येश्वर येथील बीआरटी थांबे हिरवे पडदे लावून बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे भापकर पेट्रोल पंप ते बालाजीनगर या दरम्यान बीआरटी मार्ग सलग स्वरूपात उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. या ठिकाणी रस्त्याच्या डाव्या बाजूला पदपथालगत पीएमपीचे तात्पुरते बसथांबे उभारण्यात आले आहेत.
पीएमपी बस कधी बीआरटी मार्गातून तर कधी सामान्य वाहतुकीत येत असल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. विशेषतः गर्दीच्या वेळी बस मुख्य रस्त्यावर येत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.
“सातारा रस्ता हा शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. मेट्रोच्या कामामुळे आधीच वाहतुकीवर ताण आहे. अशा परिस्थितीत पीएमपीची वाहतूक योग्य नियोजनाशिवाय बदलल्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. प्रशासनाने वाहतूक पोलिस, पीएमपी आणि मेट्रो प्रशासन यांच्यात समन्वय ठेवून योग्य उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.






