दरडीच्या भीतीने डिकसळ-पाली हादरले; अंधारात जीव मुठीत घेऊन शाळेत आश्रय, सुविधांचा मात्र अभाव
दरम्यान घरांवर कधीही दरड कोसळून झोपेतच काळ घाला घालेल, या भीतीने गेल्या ५-६ दिवसांपासून येथील ग्रामस्थ प्रचंड मानसिक दडपणाखाली आहेत. रात्री २ वाजताच्या सुमारास जेव्हा भीती वाढते, तेव्हा स्थानिक नागरिक रस्त्यावरील साचलेल्या घाण व चिखलाच्या पाण्यातून वाट काढत कसेबसे या जिल्हा परिषद शाळेत धावत येतात. परंतु, तिथे आल्यावरही त्यांची कोणतीही दखल घेणारे तिथे हजर नसते, असा गंभीर आरोप येथील महिलांनी केला आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासकीय ढिसाळ कारभाराचा पाढा वाचताना अत्यंत गंभीर बाबी समोर आणल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेचे छत पूर्णपणे गळत असून, संपूर्ण वर्गांमध्ये चिखल आणि पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना तिथे साधे बसायला किंवा झोपायलाही कोरडी जागा उपलब्ध नाही. तसेच गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्याने आधीच गाव अंधारात आहे, त्यात शाळेतही लाईटची कोणतीही व्यवस्था नाही. मोबाईलची चार्जिंग संपल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत कोणाशी संपर्क साधणेही कठीण झाले आहे. अशा अंधारात अचानक दरड कोसळली, तर नक्की कुठे पळायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
तसेच आमच्या एवढ्या मोठ्या कुटुंबांना घेऊन एका छोट्याशा आणि गळक्या शाळेत रात्र काढणे अशक्य होत आहे. गर्दीच्या ठिकाणी लहान मुले घाबरून रात्रभर रडत असतात. त्यांना या ओलसर, दमट आणि अंधाऱ्या जागेत ठेवल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे संतप्त झालेल्या स्थानिक महिलांनी संताप व्यक्त करत म्हटले की, “एवढ्या मोठ्या कुटुंबांना घेऊन त्या छोट्याशा गळक्या शाळेत राहणे नरकयातना भोगण्यासारखे आहे. जर दरड कोसळून आम्ही मेलो, तर नंतर जाहीर होणारे ५-५ लाख रुपये आम्हाला नको आहेत, ते प्रशासनाने स्वतःकडेच ठेवावेत. आम्ही जिवंत आहोत तोवरच आमची सुरक्षित राहण्याची सोय करा.” ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, जर प्रत्येक २-३ कुटुंबांना राहण्यासाठी वेगळी हक्काची खोली मिळाली आणि वीज-पाण्याची सोय झाली तर आम्ही तिथे राहण्यास तयार आहेत.
या संवेदनशील परिस्थितीमुळे स्थानिक प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाचे पुरते वाभाडे निघाले आहेत. केवळ कागदावर आणि तोंडी आदेश देऊन नागरिकांना स्थलांतरित करायचे आणि त्यांच्या मूलभूत गरजांकडे पाठ फिरवायची, या कारभारामुळे प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. कोणतीही मोठी जीवितहानी होण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात तात्काल लक्ष घालून डिकसळ पालीतील नागरिकांची योग्य व सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
Karjat Heavy Rain : कर्जतमध्ये मुसळधार पावसाचा कहर; उल्हास नदीला पूर, चार पूल पाण्याखाली






