'2029 पूर्वी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार?' मुख्यमंत्र्यांबाबत बड्या नेत्याचं मोठं विधान, राजकीय चर्चांना उधाण
राऊत म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा सुरू आहे. अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री तसेच इतर काही वरिष्ठ मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशाही चर्चा रंगल्या आहेत.
यावर भाष्य करताना राऊत म्हणाले, “जर 2029 पूर्वी देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली, तर मराठी माणूस देशाचा पंतप्रधान झाल्याचा आनंद महाराष्ट्राला होईल. त्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. उद्धव ठाकरे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.” यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. “2029 नंतर देशात भाजपचे सरकार राहणार नाही. त्यामुळे जे काही राजकीय निर्णय घ्यायचे असतील, ते 2029 पूर्वीच घ्यावेत. त्यानंतर ना नरेंद्र मोदी असतील, ना इतर कोणी,” असे विधान त्यांनी केले.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील काही खासदारांना संधी मिळू शकते, अशी चर्चा सुरू आहे. विशेषतः ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या काही खासदारांची नावे चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी या खासदारांवरही टीका केली.
“20 तारखेपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. आता या देशात गुणवत्ता किंवा मेरिटच्या आधारावर मंत्रीपदे दिली जात नाहीत. ज्यांनी मोदी-शहांशी निष्ठा ठेवली, त्यांनाच पदांची ‘हाडके’ फेकली जातात. यावेळी ती कोणाच्या वाट्याला येतात, शिंदे गटाला की आमच्याकडून गेलेल्या सहा खासदारांना, हे पाहावे लागेल,” असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात नियुक्ती किंवा पंतप्रधानपदाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. सध्या सुरू असलेल्या राजकीय चर्चांदरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
‘हे दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर जोरदार पलटवार






