कर्जत/ संतोष पेरणे : कर्जत-कल्याण राज्यमार्गावर नेरळ पोलीस ठाण्याजवळ असलेल्या पुलावर एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात नेरळ येथील मोहाची वाडी येथील रहिवासी चंद्रकांत ऐनकर वय वर्ष ४५ यांचा जागीच मृत्यू झाला. ऐन होळीच्या सणादरम्यान ही दुर्घटना घडल्याने संपूर्ण नेरळ परिसरात शोककळा पसरली आहे.अपघात घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत ऐनकर हे आपल्या दुचाकीवरून नेरळ बाजारपेठेत काही वस्तूंच्या खरेदीसाठी गेले होते. बाजारातील काम आटोपून ते पुन्हा आपल्या घराकडे परतत असताना, नेरळ पोलीस ठाण्याजवळील पुलावर त्यांच्या दुचाकीची फुलाला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, चालक ऐनकर पुलावरून खाली कोसळले. या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच नेरळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून ऐनकर यांना तात्काळ उपचारासाठी रायगड हॉस्पिटल येथे हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातामुळे कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील रस्त्यांच्या नियोजनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.राज्यमार्गाचे रुंदीकरण काही ठिकाणी झाले आहे, तर काही ठिकाणी रस्ता अत्यंत अरुंद आहे. यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडतो. नेरळ पोलीस ठाण्याजवळील पूल दोन विभागांत विभागलेले आहेत, मात्र त्यांना जोडणारा रस्ता एक पदरी आहे. दोन पूल आणि त्यांना जोडणारा हा अरुंद रस्ता वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. याच तांत्रिक त्रुटीमुळे चंद्रकांत ऐनकर यांचा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी देखील कर्जत चौक येथे भीषण अपघात झाला होता. येथून चौक कडे जाणाऱ्या एर्टिगा गाडीला समोरून येणाऱ्या एसटी गाडीने जोरदार धडक दिली.रस्त्याच्या मधोमध एसटीने ईटीका गाडीला धडक दिल्याने त्या अपघात ग्रस्त गाडीचे चालक आणि सोबत असलेले कामगार गंभीर जखमी झाले . नेरळ येथे राहणारा रिंकू सिंग आपल्या कामगाराला सोबत घेऊन वांगणी येथून चौक कडे चालला होता.त्यांची एम एच ०५ इ ए ५७१३ इर्टिका जीप घेऊन कर्जत चौक रस्त्याने चौककडे जात होती.वांगणी येथून कल्याण कर्जत रस्त्याने कर्जत आणि पुढे कर्जत चौक रस्त्याने जात असताना पनवेल येथून कर्जतकडे येणारी एसटी गाडी एम एच २० बी एल ३६२५ ही एसटी गाडी रिंकू सिंग यांच्या गाडीवर आदळली. ओव्हरटेक करीत असताना ही एसटी गाडी इर्टिका गाडीवर आदळली होती आणि त्यावेळी अपघात झाला होता.या अपघातात गाडीचे चालक गंभीर दुखापतग्रस्त झाल्याने रायगड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले गेले.तेथे उपचार घेऊन पुढील उपचारासाठी पनवेल येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. पण रिंकू सिंग यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्यांचे नातेवाईक यांनी त्यांना मुंबई येथील केईएम रुग्णालयात हलवले.तेथे रिंकू सिंग यांच्यावर उपचार सुरू होते,मात्र 19 फेब्रुवारी च्या रात्री अपघातानंतर दहाव्या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे हे राज्यमार्ग दिवसेंदिवस अपघाताचा सापळा होत आहेत.






