संग्रहित फोटो
माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखाना देशामध्ये क्रमांक एकचा करण्याचे स्वप्न अजितदादांचे होते, त्या दृष्टीने त्यांनी वाटचाल सुरू केली होती, त्यांचे हे अपूर्ण राहिलेले स्वप्न सर्व संचालक मंडळ, सभासद तसेच अधिकारी व कामगारांच्या सहकार्याने पूर्ण कर, असे आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बोलताना दिले. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार माळेगाव कारखान्यात आल्या होत्या. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे आजची निवड प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.
कारखान्याच्या अध्यक्षपदी अजितदादांच्या निधनामुळे सुनेत्रा पवार यांची निवड होणार आहे. दरम्यान माळेगाव कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आल्यानंतर त्यांनी अजित दादांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यानंतर त्यांनी कारखान्याच्या कार्यप्रणाली, ऊस गाळप हंगामाची तयारी, आर्थिक स्थिती व भविष्यातील विकास आराखड्याबाबत चर्चा संचालक मंडळ व अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
बैठकीदरम्यान माळेगाव कारखान्यामध्ये तुम्ही आम्हाला बोलवत नाही, मी माळेगाव कारखान्यामध्ये नक्की येणार आहे, असे मी स्वप्निल जगताप यांना सांगून म्हटले होते. मात्र आज अशा पद्धतीने माळेगाव कारखान्यात यावे लागेल, असं कधी वाटलं नव्हतं, असे सांगत त्यांचा कंठ दाटून आला. अजितदादांच्या अचानक जाण्याने फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने या कारखान्याची धुरा सांभाळण्याची जबाबदारी आपण सर्व संचालक मंडळ देत आहात. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या नीलकंठेश्वर पॅनलला, दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सर्व सभासदांनी विजय करून आपल्या सर्व संचालकांना या ठिकाणी निवडून दिले. आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने दादांनी या कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. अजितदादा यांचे स्वप्न होते की माळेगाव सहकारी साखर कारखाना देशात क्रमांक एक बनावा. या दृष्टीने त्यांनी पावले उचलली होती. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने, प्रामाणिकपणे व नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. “आपण सर्व मिळून अजितदादांचे स्वप्न नक्की पूर्ण करू, असा मला ठाम विश्वास आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी अश्रू आवरले
माळेगाव कारखान्यामध्ये प्रशासकीय इमारतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दाखल होताच, अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमेपुढे नतमस्तक होऊन त्यांनी अभिवादन केले. यानंतर संचालक मंडळासोबत झालेल्या बैठकीत बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता, मात्र अश्रू आवरत त्यांनी अजित दादांचे माळेगाव कारखाना देशात अग्रगण्य करण्याचे स्वप्न सर्वांच्या सहकार्याने आपण पूर्ण करू, असे आश्वासन देत संचालक मंडळाला दिलासा दिले.






