Raigad : तलावातील पाणीसाठ्याचे तीन तेरा; गाळ काढला नाही,संरक्षण कठडा कमी ठेवला, ठेकेदारांच्या हलगर्जीपणावर गावकरी आक्रमक
रायगड/ प्रवीण जाधव : खालापुरातील परखंदे गावातील तलावासाठी एक कोटी साठ लाख रुपये खर्च करून तलावाचे नव्याने काम सुरू केले. मात्र तलावात पाणी साठा वाढविण्यासाठी गाळ काढणं महत्त्वाचं आहे जो काढला नाही,संरक्षण कठडा कमी ठेवला असून निकृष्टदर्जाचे काम सुरू आहे असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावातील ग्रामस्थांनी आक्रामक पवित्रा घेत ठेकेदाराला जाब विचारत काम बंद केले आहे. सदर काम पंधरा दिवसांपासून बंद असल्याने ठेकेदारावर कारवाई होणार की नाही असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
राज्य सरकारच्या राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत रायगड जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभाग कर्जत विभागाच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे यांनी परखंदे तलावासाठी एक कोटी साठ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तलावात पाणीसाठा वाढविण्यासाठी गाळ काढला नाही,संरक्षण कठडा कमी ठेवला असून दगड टाकून काँक्रीटचा खर्च वाचवण्यासाठी निकृष्टदर्जाचे काम सुरू आहे, अशी तक्रार गावकऱ्यांनी मांडली आहे. ठेकेदारांचा हलगर्जीपणा लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्रित येत ठेकेदाराला जाब विचारला. या सगळ्या प्रकरणानंतर ठेकेदाराने उडावाउडवीची उत्तरे दिली. संतप्त ग्रामस्थांनी काम बंद केले आहे. सदर काम पंधरा दिवसांपासून बंद असल्याने ठेकेदार बदलून चांगल्या ठेकेदाराला काम देण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
तलावात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने गाळ काढून तलावाची खोली वाढविणे गरजे आहे,तलावाचा संरक्षण कठडा सहा इंचही खोल नाही अशा पध्दतीने कोट्यावधीची निधी उपलब्ध असतानाही निकृष्टदर्जाचा काम सुरू आहे . याबाबत इंजिनियर आणि ठेकेदाराला वेळोवेळी तक्रार करूनही ग्रामस्थांच्या तक्रारी गांभीर्याने घेत नसल्यामुळेच संतप्त गावकऱ्यांनी तलावाचे काम बंद केले आहे. असं ग्रामपंचायत सदस्य अंकुश मोरे यांनी सांगितलं आहे.तलावाचे काम निकृष्टदर्जाचे सुरू असल्याचे सांगूनही ठेकेदार दुर्लक्ष करीत आहेत.त्यामुळे चुकीचं काम केल्यास ग्रामस्थ ऐकणार नाहीत. पर्यावरण आणि तलाव संवर्धनासाठी शासनाने निधी दिलाय आहे.यामाध्यमातून तलावातील गाळ काढून तलावाची खोली वाढविली तर तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साठेल याचा फायदा गावातील जनावरांना होईल आणि गावातील पाणी टंचाई दूर यासाठी तलावाचे काम चांगले होणे गरजेचे आहे परंतु संबंधित ठेकेदार निकृष्टदर्जाचे काम करीत असल्याने ग्रामस्थ आक्रामक झाले आहेत.