पुढील दोन दिवसांत उकाड्यात वाढ होणार (संग्रहित फोटो)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, शुक्रवारी अनेक ठिकाणी तापमानाने ३८ ते ४१ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, नंदुरबार येथे राज्यातील सर्वाधिक ४१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये तापमान ३८ ते ४० अंशांच्या दरम्यान राहिले. सोलापूर येथे ४०.१ अंश सेल्सिअस, मालेगाव येथे ४०.० अंश सेल्सिअस, ठाणे-बेलापूर औद्योगिक परिसरात ३९.८ अंश सेल्सिअस, जळगाव येथे ३९.४ अंश सेल्सिअस, परभणी येथे ३९.३ अंश सेल्सिअस अशी उष्णतेची तीव्रता नोंदवली गेली. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे ३८.८ अंश सेल्सिअस, सातारा ३८.२ अंश सेल्सिअस, अहमदनगर ३८.१ अंश सेल्सिअस, उदगीर ३८.० अंश सेल्सिअस, नाशिक ३७.८ अंश सेल्सिअस, पुणे ३७.८ अंश सेल्सिअस, सांगली ३७.८ अंश सेल्सिअस असे तापमान नोंदले गेले.
हेदेखील वाचा : पंजाब, राजस्थानसह अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; डोंगराळ भागांत बर्फवृष्टीचा अंदाज तर…
दरम्यान, मुंबईतही उष्णतेची झळ कायम असून, सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३७.० अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे ३४.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. फाल्गुन महिना सुरू असून मुंबईत उन्हाचा चटका वाढत आहे. शहरातील तापमानाचा पारा काही केल्या खाली येत नसल्याचे चित्र आहे.
मुंबईकरांना उन्हाचा चटका
शुक्रवारी मुंबईतील काही ठिकाणी कमाल तापमानाने ३७ ते जवळपास ४० अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. भारतीय हवामान विभागाच्या स्वयंचलित हवामान केंद्रांच्या नोंदींनुसार विक्रोळी येथे ३९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, शहरातील हा सर्वाधिक पारा ठरला. त्यामुळे ‘फाल्गुनदाह’ अनुभवावा लागत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विक्रोळीपाठोपाठ राम मंदिर परिसरात ३८.६ अंश, विद्याविहारमध्ये ३७.९ अंश, टाटा पॉवर चेंबूर येथे ३७.१ अंश सेल्सिअस नोंद झाली.
आरोग्याची काळजी घ्याच
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक असून, शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी वेळोवेळी पाणी पिणे, थेट उन्हात जास्त वेळ राहणे टाळणे आणि प्रकृती बिघडल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्याची सूचना तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे.






