राज्यात पावसाचा जोर कायम! कुठे, कोणता अलर्ट? जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज? (फोटो सौजन्य-ChatGPT)
Maharashtra Weather Update News In Marathi: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून राज्यातील विविध भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) आणि स्कायमेटच्या ताज्या अंदाजानुसार आज (25 जुलै 226) पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि काही उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील घाटमाथा आणि डोंगराळ भागांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. घाट परिसरात मात्र पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने वाहतूक आणि जनजीवनावर परिणाम होऊ शकतो. आज पुण्याचे कमाल तापमान सुमारे २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
मुंबईसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून शहर आणि उपनगरांतील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तर ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. या भागांत काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडू शकतो. कोकण आणि गोवा परिसरात मान्सून अत्यंत सक्रिय असल्याने ‘व्हेरी हेवी रेन’चा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टी भागात ताशी ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमार आणि समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांसाठी आजच्या भरती-ओहोटीच्या वेळा पुढीलप्रमाणे आहेत:
पहिली ओहोटी: पहाटे २.३४ वाजता (४.१३ फूट)
पहिली भरती: सकाळी ९.५९ वाजता (११.६१ फूट)
दुसरी ओहोटी: दुपारी ३.५६ वाजता (७.८४ फूट)
दुसरी भरती: रात्री ८.५१ वाजता (९.९१ फूट)
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांतही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नाशिकच्या घाटमाथ्यावर मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहून मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. येथे कमाल तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते.
विदर्भात मान्सूनचा प्रभाव तुलनेने कमी असला तरी बहुतांश भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू शकतात. अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिममध्ये तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता असून सध्या कोणताही मोठा हवामानाचा धोका नसल्याचे सांगण्यात आले आहे.
पुणे घाटमाथा, कोकण आणि डोंगराळ भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेता पर्यटकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. नदी, नाले, धबधबे आणि जलाशयांच्या परिसरात जाणे टाळावे. तसेच स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः धार्मिक यात्रा आणि पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे.






