रुक्मिणीमाता पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान! टाळ-मृदंगाच्या गजरात कौंडण्यपूरनगरीत पालखीला निरोप
टाळ, मृदंग, वीणेचा नाद आणि रुक्मिणीमातेचा जयघोष यामुळे शुक्रवारी कौंडण्यपूरनगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली. विदर्भाची पुरातन राजधानी आणि श्री रुक्मिणीमातेचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून ४३२ वर्षांची अखंड परंपरा लाभलेली मातारुख्मिणीची पालखी हजारो वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.(फोटो सौजन्य – AI)
Ashadhi Ekadashi 2026: विठ्ठल भक्तांसाठी मोठी आनंदवार्ता! १६ …
पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मातेची विधिवत पूजा-अर्चा करून साडी-चोळी अर्पण करण्यात आली. तसेच ओटी भरून माहेरातून लेकीला सासरी पाठविण्याच्या परंपरेनुसार भावपूर्ण वातावरणात पालखीला निरोप देण्यात आला. पालखी मंदिरातून मार्गस्थ झाल्यानंतर गावातील विविध भागांत ग्रामस्थांनी तिचे उत्स्फूर्त स्वागत केले. ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची उधळण, आरती आणि पूजन करून मातेप्रती आपली श्रद्धा व्यक्त करण्यात आली. गावकऱ्यांच्या वतीने सरबत वाटपही करण्यात आले. महिला भजन मंडळांनी फुगडी व भक्तिगीतांच्या माध्यमातून वातावरण भक्तिरसाने भारून टाकले. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘विठ्ठल विठ्ठल’ नामस्मरणात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
यानंतर पालखी पाचपावली स्थळी पोहोचताच अंबा रुख्मिणी महोत्सव समिती व रविराज देशमुख मित्रपरिवार तसेच पंचक्रोशीतील भाविकांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर उजळून निघाला. यावेळी रविराज देशमुख व गायत्री देशमुख यांनी सपत्नीक पालखीचे पूजन केले. त्यानंतर महाआरती करून उपस्थित वारकरी व भाविकांनी अत्यंत भावुक वातावरणात मातेच्या पालखीला निरोप दिला. माहेरातून लेक सासरी जात असल्याचा भावस्पर्शी प्रसंग अनेकांच्या मनाला चटका लावून गेला. कौंडण्यपूर येथून पालखीच्या प्रस्थानावेळी अंबा रुक्मिणी महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, संजय महाराज ठाकरे, पंकज महाराज महल्ले, श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष नामदेवराव अंबाळकर, सरपंच प्रेमदास राठोड, अक्षय पुंडेकर तसेच अंबा रुक्मिणी महोत्सव समितीचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
कौंडण्यपूर ते पंढरपूर हा पालखी सोहळा केवळ धार्मिक परंपरा नसून विदर्भाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक मानला जातो. गेल्या ४३२ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेली ही परंपरा आजही हजारो वारकऱ्यांना भक्ती, श्रद्धा आणि संस्कारांची प्रेरणा देते. हा पालखी सोहळा महाराष्ट्रातील मानाचा सोहळा असून माता रुख्मिणीच्या पालखीला पंढरपूर येथे विशेष महत्त्व आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही पालखी विठुरायाच्या गाभाऱ्यात असते आणि त्या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने तिचे पूजन केले जाते.






