एकल महिलांच्या आर्थिक-सामाजिक उन्नतीसाठी जिल्हा परिषद कटिबद्ध; विविध योजनांचा लाभ देणार - डॉ. प्रिया शिंदे
सातारा : जिल्हा परिषदेकडील विभागांकडील विविध योजनांचा लाभ देऊन एकल महिला आर्थिक व सामाजिक उन्नती केली जाईल. यासाठी जिल्हा परिषद कटीबद्ध असल्याचे, प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात एकल महिला दिनानमित्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव प्रियदर्शनी वाघमारे, उपाध्यक्ष राजू भोसले, महिला व बाल विकास समितीच्या सभापती ऋतुजा शिंदे, कृषी सभापती लता कर्णे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी नागेश ठोंबरे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
उमेदच्या माध्यमातून जिल्ह्यात बचत गटांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे, असे सांगून जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. शिंदे म्हणाल्या, ग्रामीण भागातील एकल महिलांना बचत गटाशी जोडण्यात येवून त्यांची उन्नती साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिला शेतकरी गटांना जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. ज्या ठिकाणी महिलांचा मान सन्मान राखला जाते या ठिकाणी सुख शांती लाभते. महात्मा जोतिबा फुले यांनी विधवांचे पुनर्वसनाचे काम सुरु केले होते ते या पुढेही चालू ठेवूया तीच खरी महात्मा जोतिराव फुले यांनी श्रद्धांजली अर्पण होईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, मिशन वात्सल्य अंतर्गत नोव्हेंबर 2025 पासून जिल्ह्यात एकल महिलांच्या सर्व्हेक्षणाचे काम सुरु आहे. या सर्व्हेक्षणांतर्गत 1 लाख 57 हजार महिला ह्या एकल महिला आढळून आल्या. या महिलांना छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत विविध योजनांचा लाभ व विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. एकल महिला शेतकरी आहे त्यांनी आजूनही शेतकरी ओळखपत्र काढले नाही त्यांनी तात्काळ ओळखपत्र काढावे, असे आवाहन करुन ज्या एकल महिलांचे प्रॉपर्टी कार्डवीर नाव लागले नाही अशा महिलांचे प्रॉपर्टी कार्डवर नाव लावण्यासाठी प्रशासन कटीबद्ध असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यातील एकल महिलांना जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा लाभ देऊन त्यांची उन्नती साधली जाईल. या पुढे विधवा महिलांचा एकल महिला असा उल्लेख करावा, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागरान यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी एकल महिलांना, शिधापत्रिका, संजय गांधी निराधार, बाल संगोपन यासह विविध योजनांचा प्रातिनिधी स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते लाभ देण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. ठोंबरे यांनी केले तर आभार श्रीमती पाटील यांनी मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील हजारो एकल महिला उपस्थित होत्या.
हरित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल; तापमान वाढीला ब्रेक लागणार! वनविभागाची तब्बल 30 लाख वृक्ष…






