(फोटो सौजन्य- सोशल मीडिया) संकटात आता फक्त '112' डायल करा
सोलापूर: सोलापूर ग्रामीण पोलिसांनी नागरिकांसाठी एक महत्त्वाची सुविधा सुरू केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत आता नागरिकांना पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका या तिन्ही सेवा एका कॉलवर उपलब्ध होणार आहेत. यासाठी नागरिकांनी फक्त 112 हा क्रमांक डायल करायचा आहे.ही एकात्मिक आपत्कालीन सेवा २४ तास कार्यरत असून, नागरिकांनी या सुविधेचा जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे. (Solapur News)
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आलेली ही सेवा नागरिकांना विनामूल्य उपलब्ध आहे. 112 या क्रमांकावर कॉल केल्यानंतर अत्याधुनिक GPS तंत्रज्ञानाच्या मदतीने नियंत्रण कक्षातून सर्वात जवळील पोलिस वाहन, रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाला तात्काळ माहिती पाठवली जाते. त्यामुळे मदत कमी वेळेत घटनास्थळी पोहोचू शकते.
112 India’ हे मोबाईल अॅप देखील उपलब्ध
याशिवाय नागरिक ‘112 India’ हे मोबाईल अॅप डाउनलोड करूनही मदत मागू शकतात. या अॅपमधील SOS बटण आणि लाईव्ह लोकेशन सुविधेमुळे नियंत्रण कक्षाला अचूक ठिकाणाची माहिती मिळते. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आपत्कालीन परिस्थितीतील नागरिकांसाठी ही सुविधा अधिक उपयुक्त ठरणार आहे.
पोलिसांनी नागरिकांना डायल 112 चा वापर केवळ खऱ्या आपत्कालीन परिस्थितीतच करण्याचे आवाहन केले आहे. खोटी माहिती देणे किंवा विनाकारण कॉल करणे टाळावे. कॉल करताना घटनेचे ठिकाण आणि परिस्थितीची स्पष्ट माहिती द्यावी तसेच पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.
आदिनाथ साखर कारखान्याच्या लिलावाला नारायण पाटीलांचा विरोध; ‘रक्त सांडू पण आदिनाथ विकू देणार नाही’






