पंढरपूर : पंढरीचा विठूराया हा गरिब कष्टकऱ्यांचा देव म्हणून ओळखला जातो. अनेक भाविक दर्शनासाठी शेकडो मैल पायी येतात आणि सावळ्या विठुरायाच्या चरणी लीन होतात. याच विठूरायाच्या गरिब भक्तांमध्ये एक मोठा दानशूर भेटला म्हणायला हरकत नाही. दोन वर्षाच्या कालखंडानंतर यावर्षी पंढरपूर आषाढी यात्रेचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यात्रेदरम्यान सुमारे सात ते आठ लाख भाविकांनी विठुरायाचे पदस्पर्श आणि मुख दर्शन घेतले. या दरम्यान भाविकांनी विठ्ठलाच्या चरणावर जवळपास पाच कोटी सत्तर लाख रुपयांची देणगी अर्पण केली आहे. दोन वर्षाच्या तुलनेत यंदाच्या आषाढी यात्रेत एक कोटी तीस लाख रुपयांची देणगीत भर पडली आहे अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
काेराेनामुळे गेली दोन वर्ष आषाढी वारी मर्यादित वारक-यांच्या उपस्थितीत पार पाडली. त्यामुळे यंदा पंढरपूरात भाविकांची मांदियाळी हाेती. यंदाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यंदा सात ते आठ लाख भाविक पंढरपूरात दाखल झाले हाेते. सन 2019 मध्ये झालेल्या आषाढी यात्रेत विठ्ठल मंदिर समितीला चार कोटी चाळीस लाख रुपयांची देणगी मिळाली होती. यावर्षी विठ्ठलाला सोने आणि चांदीचे दागिने ही मोठ्या प्रमाणावर भाविकांनी दान केले आहेत. यंदाच्या आषाढी यात्रेत एक कोटी तीस लाख रुपयांची देणगीत भर पडली आहे.
[read_also content=”नितीन राऊत यांच्या मतदानावर बबनराव लोणीकरांनी घेतला आक्षेप, काय आहे कारण? : वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/maharashtra/babanrao-lonikar-objected-to-nitin-rauts-vote-what-is-the-reason-read-in-detail-nrdm-305427.html”]
दरम्यान भाविकांनी मंदिर समितीला देणगी स्वरूपात दान केल्यास समितीच्या वतीने भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत होईल असेही मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले आहे.