कल्याण :- गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची प्रमुख संस्था असलेल्या कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या शिष्टमंडळाने आज केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली. रस्त्यांवर पडलेले खड्डे, अस्वच्छता आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर केडीएमसीकडून अतिशय संथपणे कामे सुरू असल्याबाबत महामंडळाचे अध्यक्ष वरुण पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शहरात रस्त्यांवर खड्डे आणि अस्वच्छता
गणेशोत्सव तोंडावर आला असला तरी अद्याप शहरात जागोजागी प्रचंड खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे, हेही कमी म्हणून की काय त्याचजोडीला काही ठिकाणी अस्वच्छतेचे चित्र दिसून येत आहे. मात्र त्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेकडून अतिशय संथगतीने कार्यवाही सुरू असल्याचे महामंडळातर्फे आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तर रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सार्वजनिक किंवा घरगुती गणपती आणणे अडचणीचे ठरणार असल्याचा महत्त्वाचा मुद्दाही सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून या बैठकीत मांडण्यात आला.
कामे 1-2 दिवसात पुर्ण करण्याचे आयुक्तांचे आश्वासन
केडीएमसी आयुक्तांसोबत झालेल्या या बैठकीमध्ये शहरातील स्वच्छता, पथदिवे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या परवानग्या, विसर्जन घाटावरील अपूर्ण तयारी आदी प्रमूख विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष वरुण पाटील यांनी दिली आहे. तर ही सर्व कामे येत्या 1-2 दिवसांत आम्ही पूर्ण करू असे आश्वासन कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या शिष्टमंडळाला दिल्याचेही त्यांनी सांगितले.
या बैठकीला कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष वरुण पाटील यांच्यासह महामंडळाचे विजय कडव, राकेश मुथा, प्रतीक पेणकर, सुधीर वायले, महेश बनकर, सागर भालेकर, कुणाल गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
काल (दि. 1 सप्टेंबर) कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी खड्डे भरण्यात केडीएमसी प्रशासन स्पेशल अपयशी ठरले असून गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त झाले नाही तर आमच्या पद्धतीने धडा शिकवू असा थेट प्रशासनाला इशारा दिला आहे. तसेच खड्ड्यांमुळे एखादी दुर्घटना घडून शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला संपूर्णपणे केडीएमसी आयुक्त जबाबदार असतील अशा शब्दांत आमदार भोईर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.