सौजन्य - नवराष्ट्र टीम
ईश्वरपूर/विनोद मोहिते : शाळेच्या वर्गात एकाच बाकावर बसून स्वप्ने पाहणारे मित्र, आज उरुण-ईश्वरपूर नगरपालिकेच्या सभागृहात शहराच्या भवितव्याचा विचार करताना एकत्र दिसणार आहेत. शालेय जीवनातील घट्ट मैत्री, सामाजिक जाणीव आणि सार्वजनिक सेवेसाठीची तळमळ यांचा अनोखा संगम नगरपालिकेच्या राजकारणात पहायला मिळत आहे. एकाच वर्गात शिक्षण घेतलेले तीन मित्र एकाचवेळी नगरसेवक झाल्याने हा योग शहराच्या राजकीय इतिहासात दुर्मिळ ठरला आहे.
भाजपचे राजवर्धन पाटील, अमित ओसवाल आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे सचिन कोळी हे तिघेही शालेय जीवनात वर्गमित्र होते. आज वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधित्व करत असले तरी शहराच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचा त्यांचा निर्धार नागरिकांमध्ये आशेचा किरण निर्माण करणारा ठरत आहे.
या तिघांनी आदर्श बालक मंदिर मध्ये काही वर्षे एकत्रित माध्यमिक शिक्षण घेतले आहे. तर २००३ साली इस्लामपूर हायस्कूल, इस्लामपूर येथून दहावीची परीक्षा दिली होती. भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक हे देखील या तिघांचेच वर्गमित्र असल्याने त्या काळातील वर्ग आज राजकीय वर्तुळात विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिघांनीही सामाजिक कार्यातून राजकारणात प्रवेश केला.
नुकत्याच पार पडलेल्या उरुण–ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीत भाजपचे राजवर्धन पाटील हे विक्रमी मतांनी थेट निवडून आले. तर पक्षाच्या आदेशानुसार अमित ओसवाल आणि सचिन कोळी यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली होती. त्यानंतर दोघांचीही स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली. या निवडीमुळे उरुण–ईश्वरपूरच्या इतिहासात प्रथमच तीन वर्गमित्र एकाचवेळी नगरसेवक झाले आहेत.
शालेय मैत्रीचा सार्वजनिक जीवनात प्रवेश
शाळेतील उपक्रम, खेळ, सहली आणि अभ्यासाच्या आठवणी जपत हे मित्र पुढे सामाजिक प्रश्नांवर एकत्र काम करत राहिले. नागरिकांच्या अडचणी, परिसरातील विकास आणि शहराच्या प्रगतीसाठी समान दृष्टीकोन असल्यानेच त्यांनी सार्वजनिक जीवनात सक्रिय भूमिका घेतली. आज हीच मैत्री नगरपरिषदेच्या सभागृहात सकारात्मक वातावरण निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राजवर्धन पाटील यांच्या विजयासह अमित ओसवाल व सचिन कोळी यांच्या स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीने शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. समर्थकांनी फटाके फोडून, मिठाई वाटून जल्लोष साजरा केला. “वर्गातली मैत्री आता शहराच्या विकासासाठी कामी येईल,” अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, नागरी सुविधा, युवकांसाठी उपक्रम आणि पारदर्शक कारभार यावर विशेष भर देणार असल्याचे तिघांनीही स्पष्ट केले आहे. पक्षभेद बाजूला ठेवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र काम करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
हे सुद्धा वाचा : ऐन निवडणुकीत गोंधळ; पतीचे महिला उमेदवारासोबत दुसरे लग्न अन् पहिली पत्नी…
तरुणांसाठी प्रेरणादायी प्रवास.!
शालेय वर्गापासून नगरपरिषदेच्या सभागृहापर्यंतचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. राजकारणात मतभेद असू शकतात, मात्र मैत्री, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी टिकवता येते, हे या तिघांच्या यशातून अधोरेखित झाले आहे. येत्या पाच वर्षात तिघे मित्र शहरासाठी काय योगदान देवू शकतात याबाबत उत्सुकता आहे. अमित ओसवाल हे यापूर्वी नगरसेवक होते. तर सचिन कोळी यांना कोणताही राजकीय वारसा नाही. राजवर्धन पाटील यांचे वडील अशोक पाटील पुर्वी नगरसेवक होते.






