वाई शहरातील ₹२२ कोटी ८४ लाख ३९ हजार ३९३ रुपयांच्या सांडपाणी प्रक्रिया (एसटीपी) प्रकल्पातील कथित भोंगळ नियोजन आणि ठेकेदाराच्या गलथान कारभाराचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी नदीपात्रात तात्पुरत्या स्वरूपात सांडपाणी वळविण्यासाठी गाडण्यात आलेल्या पाइप थेट कृष्णा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याचे दृश्य सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पाहायला मिळाले. एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पात अशा प्रकारे पाइप वाहून जाणे म्हणजे कामाच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले आहे. याहून गंभीर बाब म्हणजे नदीपात्रात बसविण्यात आलेले कोरीव दगडी बांधकामही वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोट्यवधींचा खर्च करूनही प्रकल्पाची गुणवत्ता आणि सुरक्षितता धोक्यात आल्याचा आरोप होत आहे.
शहरातील सांडपाणी व्यवस्थेचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत मंजूर झालेल्या या प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने ४ मार्च २०२४ रोजी प्रशासकीय मंजुरी दिली होती. जुलै २०२४ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मात्र आजघडीला केवळ सुमारे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित ३५ टक्के काम रखडले आहे.
हा प्रकल्प अहमदाबादस्थित मिरल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमार्फत राबविला जात असून, सोनगीरवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या एसटीपी प्लांटचे फाउंडेशन तब्बल १७ ते १८ फूट खोल करण्यात आले असल्याचे पालिकेच्या बांधकाम विभागाने सांगितले आहे. शहरभर ६ इंच ते ४ फूट व्यासाच्या पाइपलाइनचे जाळे उभारले जाणार असून त्याचे डिझाइन CPHEEO च्या निकषांनुसार तयार करण्यात आल्याचा दावा प्रशासन करत आहे.
मात्र प्रत्यक्ष कामकाजात अनेक गंभीर त्रुटी समोर येत आहेत. मूळ आराखड्यानुसार नावेचीवाडी येथून पाइपलाइनचे काम सुरू होणे अपेक्षित असताना तो भाग ‘खड्ड्यात’ दाखवून कामाचा मार्ग बदलत साठे मंगल कार्यालय परिसरातून काम सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या नियोजनावरच प्रश्न उपस्थित होत आहेत.
कृष्णा नदीच्या दोन्ही तीरांवर म्हणजे सोनगीरवाडी आणि रविवार पेठ स्मशानभूमी परिसरात एसटीपी प्रकल्पासाठी आरक्षण आहे. सोनगीरवाडी येथील वनारसे यांच्या जागेचा ताबा पालिकेला मिळाला असला तरी रविवार पेठ येथील नेवसे यांच्या जागेचा ताबा अद्याप तांत्रिक कारणांमुळे मिळालेला नाही. त्यामुळे भुयारी गटार योजना आणि दुसरा एसटीपी प्रकल्पही रखडल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार ही जागा मिळाल्यास भविष्यात सांडपाणी उचलण्याचा अतिरिक्त खर्च वाचणार असून संपूर्ण व्यवस्था अधिक कार्यक्षम होईल. दरम्यान, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधीच उपलब्ध नसल्याचे वास्तवही समोर आले आहे. पालिकेकडे सुमारे साडेआठ कोटी रुपयांची तरतूद झाल्याशिवाय उर्वरित काम पूर्ण होणे कठीण असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे निधीअभावी प्रकल्प अर्धवट राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Kalyan News : टिटवाळा-बल्ल्यानी रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड; मुसळधार पावसाने वाहतूक धोक्यात, प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप
“एनओसी नाही, टाउन प्लॅनिंगची परवानगी नाही; फक्त प्लांट उभारून बिले काढायची का?” नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात. नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी एसटीपी प्रकल्पावर गंभीर आरोप करत प्रशासनाच्या निर्णयांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “प्रशासकीय काळात झालेल्या चुकीच्या निर्णयांची चौकशी करण्यासाठी सीए नेमला असून त्यावर कार्यवाही सुरू आहे. एसटीपी प्रकल्पासाठी आम्ही हरित लवादापर्यंत गेलो. सर्व विभागांच्या आवश्यक एनओसी घेतलेल्या नाहीत. टाउन प्लॅनिंग विभागाची परवानगीही घेतलेली नाही. उभारण्यात येणाऱ्या एसटीपी प्लांटला भक्कम बेस नसल्याचा आमचा आरोप आहे. नावेचीवाडी खड्ड्यात दाखवून तेथून पाइपलाइन न नेता साठे मंगल परिसरातून काम सुरू करण्यात आले. फक्त प्लांट उभारून बिले काढायची का? ठेकेदाराकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळत नाही. पालिकेकडे साडेआठ कोटी रुपयांची तरतूद झाल्याशिवाय हा प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही. प्रशासकीय काळात कन्सल्टंटला ६० लाख रुपये देण्यात आले, मग उर्वरित सात कोटींचा निधी मंजूर करून का आणला नाही? यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयाचेही मार्गदर्शन घेतले आहे.”
नगराध्यक्षांच्या या आरोपांमुळे एसटीपी प्रकल्पाच्या दर्जा, निधी, परवानग्या आणि नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, कोट्यवधी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अखेर शहराला दिलासा देणार की भ्रष्ट व भोंगळ कारभाराचे आणखी एक उदाहरण ठरणार, याकडे आता वाईकरांचे लक्ष लागले आहे.






