सुप्रिया सुळेंचा संताप; राज्यात 'आणीबाणी' जाहीर करण्याची मागणी (Photo Credit- X)
माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यात यापूर्वीही पाऊस झाला आहे आणि मुंबई-पुण्याला पाऊस नवा नाही. पण असं भयानक चित्र पूर्वी कधीच नव्हतं. हे कदाचित पहिल्यांदाच पाहायला मिळत असून अतिशय चिंताजनक आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने संपूर्ण राज्याचा आढावा घेऊन राज्यात आणीबाणी जाहीर करावी. महाराष्ट्राचे नेमकं चित्र काय आहे? यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने भाष्य करणे आवश्यक आहे.
मुंबई-पुण्यासह अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे शहरांमध्ये अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतूकीची कोंडी होत असून यामुळे नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. माझी शासनाला विनंती आहे की, पुण्यातील राजीव गांधी इन्फोटेक पार्कसह पावसाचा तडाखा बसलेल्या… — Supriya Sule (@supriya_sule) July 6, 2026
मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि बहुचर्चित ‘मिसिंग लिंक’सह अनेक महत्त्वाचे मार्ग बंद झाले आहेत. ताम्हिणी घाटातही वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, “आळंदीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे, रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी दरडी कोसळत (Landslides) आहेत. मुंबई आणि पुण्यासारख्या दोन प्रमुख शहरांतील संपर्क तुटल्यासारखी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत एखादा रुग्ण, डॉक्टर, विद्यार्थी किंवा अत्यावश्यक कामासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांचे काय? सरकारने यावर वस्तुस्थिती जनतेसमोर मांडली पाहिजे.”
पुण्यावर घोंघावतंय भयंकर संकट; सावधान! Khadakwasla Dam मधून कोणत्याही क्षणी…, नागरिकांना आवाहन
नुकत्याच सुरू झालेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाचा उल्लेख करत सुप्रिया सुळे यांनी सरकारला घेरले. या प्रकल्पाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते आणि सर्वांनी त्याचे स्वागत केले होते. मात्र, आता पावसाळ्यात या प्रकल्पाशी संबंधित समोर येणारे व्हिडिओ अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक आहेत. या प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला, मग नियोजन का चुकले? या प्रकल्पाचे ‘सेफ्टी ऑडिट’ झाले होते का? नैसर्गिक आपत्तीचा विचार करून डिझाईन केले होते का? याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच वसई-विरार, भांडूप आणि मुंबईत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांमध्ये सुरक्षितता आणि पर्यावरणाचा पुरेसा विचार झालेला नसल्याचा आरोप करत त्यांनी पारदर्शक चौकशीची मागणी केली.
सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सत्ताधारी नेते सतत केवळ विरोधकांवर कारवाया करण्यात आणि राजकारणात व्यस्त आहेत. सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनाकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, अशी भावना जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. दरम्यान, अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर चंदा चोरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की, हा मुद्दा आगामी संसदेच्या अधिवेशनात ‘इंडिया’ (INDIA) आघाडी ताकदीने मांडेल, तसेच या विषयावर आघाडीच्या आगामी बैठकीतही सविस्तर चर्चा केली जाईल.






