टिटवाळा-बल्ल्यानी रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड; मुसळधार पावसाने वाहतूक धोक्यात, प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप
या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या भगदाडामुळे अपघाताचा धोका वाढला असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या घटनेनंतर शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी मयूर पाटील यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, या रस्त्याची स्थिती धोकादायक असल्याची माहिती यापूर्वीच संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. तसेच रस्त्याची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आज ही गंभीर घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वेळेत दुरुस्ती झाली असती, तर रस्ता खचण्याची वेळ आली नसती, असेही त्यांनी म्हटले.
या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मयूर पाटील यांनी केली आहे. दरम्यान, मुसळधार पावसाचा अंदाज कायम असल्याने अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी धोकादायक रस्ते, पूल आणि पावसामुळे कमकुवत झालेल्या भागांची तातडीने तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनीही या मार्गावरून प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
तसेच या मुसळधार पावसामुळे नेतिवली ते मलंगगड रस्ता जलमय झाला आहे. या रस्त्याच्या दूतर्फा मागील 10 वर्षात बेकायदा इमारतींची बांधकामे झाली. त्यामुळे या भागातील नैसर्गिक प्रवाह बंद झाल्याने पावसाचे पाणी थेट मलंगगड रस्त्यावर येत आहे. आडिवली ढोकळी भागातील स्थानिक राजकीय मंडळी या सर्व प्रकाराला जबाबदार असल्याचे या भागातील रहिवासी सांगत आहे.






