यावर्षी पावसाने एकाच दिवसात तब्बल २० इंच पाऊस पडून आपलेच जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. निसर्गाचे हे रौद्ररूप रोज नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. रविवार सकाळी ८ ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत अवघ्या २४ तासांत ५१३ मि.मी. (२० इंच) पावसाची नोंद झाली असून, हे या वर्षातले सर्वात भीतीदायक आणि नवे रेकॉर्ड ठरले आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ जूनपासून आज अखेरपर्यंत महाबळेश्वर परिसरात तब्बल १७२७.४० मि.मी. (६७ इंच) इतका आज पर्यंत पाऊस झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे महाबळेश्वर परिसरातील जनजीवन पूर्णतः कोलमडून गेले आहे. या पावसाने केवळ शहरालाच नाही, तर ग्रामीण भागालाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. वेण्णा लेकजवळील री जंठाकडे जाणाऱ्या वेण्णा नदीवरचा लोखंडी पूल पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे खचला. यामुळे पुलावर उभी असलेली तीन वाहने थेट नदीपात्रात कोसळली सुदैवाने घटनेची माहिती मिळताच नगरपालिका प्रशासनाने तातडीने धाव घेतली आणि युद्धपातळीवर प्रयत्न करून ही वाहने नदीपात्रातून क्रेन द्वारे बाहेर काढली.
प्रशासनाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. वेण्णा लेक आणि महाबळेश्वरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे. या जलमय रस्त्यांतून वाट काढताना वाहनचालकांना शरथीचे प्रयत्न करावे लागत होते . महाबळेश्वर-पाचगणी मुख्य रस्त्यावरील बगीचा कॉर्नर नजीक पाणी आल्याने वाहतूक मंदावली होती त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती.
ग्रामीण भागाची अवस्था तर अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक वाड्या-वस्त्यांचे रस्ते खचले असून, महाकाय झाडे कोलमडून पडली आहेत मातीचे लोट व दगडी रस्त्यावर आली असल्याने घाट रस्ते बंद झाले आहेत. घावरी-येरणे रस्ता खचल्यामुळे या मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे. सोळशी नदीला आलेल्या पुरामुळे येरणे खुर्द, येरणे बुद्रुक, आणि आचली या गावांचा असलेला संपर्क पूर्णतः तुटला आहे. दळणवळणाची सर्व साधने बंद पडली आहेत.
महाभयंकर संकट? Pune शहराला मुसळधार पावसाचा इशारा; सिंहगड किल्ला बंद अन् खडकवासला धरण…
महाबळेश्वर-प्रतापगड रोडवरील हारोशी गावाच्या वरच्या बाजूला असलेल्या छोट्या जन्नी माता मंदिर परिसराजवळील रस्ता घाटा च्या कडेला खचला आहे. ज्यामुळे या संपूर्ण रोडला मोठा धोका निर्माण झाला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे संपूर्ण तालुक्याचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीज नसल्यामुळे गावागावांतील पाणी पुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. परिणामी, चहूबाजूला पाण्याचे साम्राज्य असतानाही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
रात्रीच्या वेळी गावागावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरत असून, मोबाईल आणि इंटरनेट सुविधा पूर्णतः विस्कळीत झाली आहे. अशा परिस्थितीत एखादी वैद्यकीय किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, तर प्रशासनाशी संपर्क कसा करायचा? हा प्रश्न आता इथल्या जनतेला सतावत आहे. सुरुवातीला शेतकरी राजा या पावसाने सुखावला होता, समाधानी झाला होता. मात्र, आता रोजच्या जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा वीज, पाणी, मोबाईल नेटवर्क सर्व काही बंद झाल्याने ग्रामीण जनतेचे जगणे अत्यंत कठीन झाले आहे. प्रशासनाने या सुविधा लवकरात लवकर पूर्ववत कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
तालुक्यातील मोरणी येथे एक महाकाय वृक्ष रस्त्यावर उन्मळून पडल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. गावातील तरुण कार्यकर्ते आणि स्थानिक लोक स्वतःचा जीव धोक्यात घालून, पाऊस-वाऱ्याची पर्वा न करता रस्ता मोकळा करण्यासाठी झाड हटवण्याचे काम करत आहेत. मात्र, अशा वेळी संवेदनशील राहण्याऐवजी वन विभाग मात्र आपला अडमुठेपणा दाखवत आहे. त्यांच्या या जाचक नियमांमुळे आणि असहकार्यामुळे मदतकार्यात नाहक विलंब होत असून, स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाबळेश्वर चे तहसीलदार सचिन म्हस्के, नगरध्यक्ष सुनील शिंदे मुख्याधिकारी योगेश पाटील, यांनी जनतेला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
पावसाचा तडाखा कायम; घाटमाथ्यातील सहा तालुक्यांतील शाळांना सुट्टी, उर्वरित जिल्ह्यात वर्ग नियमित






