(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
आमिर खान प्रॉडक्शन्सच्या आगामी ‘एक दिन’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. हृदयाला भिडणारी आणि भावनिक प्रेमकथा सादर करणाऱ्या या चित्रपटाने आपली झलक आणि सुरेल गाण्यांमुळे आधीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या निमित्ताने आमिर खान आणि मन्सूर खान ही लोकप्रिय जोडी दीर्घ काळानंतर पुन्हा एकत्र आली आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली आहे.
Dhurandhar 2 Collection: रणवीर सिंगच्या चित्रपटाची धडाकेबाज कामगिरी; चित्रपटाने गाठला कोटींचा टप्पा
‘एक दिन’मध्ये निर्माता म्हणून काम करताना मन्सूर खान यांनी आपली भूमिका वेगळ्या पद्धतीने पार पाडल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, “चित्रपटात दिग्दर्शक एकच असतो, त्यामुळे मी स्वतःला एका ‘निगराणी’ करणाऱ्या व्यक्तीसारखं समजत होतो. दिग्दर्शक अब्बास टायरवाला यांना मी सतत अभिप्राय देत होतो आणि त्यांनीही त्याचे मनापासून स्वागत केले. माझ्यासाठी प्रामाणिकपणे काम करणं नेहमीच महत्त्वाचं राहिलं आहे. मला प्रेरणा देणारे विषय आणि व्यक्तिरेखा निवडणं मी प्राधान्याने केलं. ‘एक दिन’ हा क्षणिक विस्मरणाच्या आजारासारख्या संवेदनशील विषयाला स्पर्श करणारा चित्रपट आहे. कथालेखन अंतिम करण्यापासून चित्रीकरण, संपादन आणि ध्वनीपर्यंत माझा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.”
दीर्घ काळानंतर आमिर खान आणि मन्सूर खान पुन्हा एकत्र येत असल्याने हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय सर्जनशील जोडी पुन्हा सक्रिय झाली आहे. ‘कयामत से कयामत तक’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘अकेले हम अकेले तुम’ आणि ‘जाने तू… या जाने ना’ यांसारखे अविस्मरणीय चित्रपट देणाऱ्या या जोडीने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. आता ‘एक दिन’च्या माध्यमातून ते पुन्हा एकदा रोमँटिक जॉनरमध्ये परतत आहेत, त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
आमिर खान प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘एक दिन’मध्ये साई पल्लवी आणि जुनैद खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या ताज्या जोडीमुळे चित्रपटाला नवं आकर्षण लाभलं आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील पांडे यांनी केले असून, निर्मिती आमिर खान, मन्सूर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी केली आहे. एकूणच, भावनिक कथा, दमदार टीम आणि लोकप्रिय जोडीचे पुनरागमन यामुळे ‘एक दिन’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. हा चित्रपट १ मे २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, तो प्रेक्षकांच्या मनावर कोणती छाप पाडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






