( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेली १८ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल ही व्यक्तिरेखा आजही चाहत्यांची सर्वाधिक आवडती आहे. अभिनेता दिलीप जोशी यांनी साकारलेल्या या भूमिकेमुळे त्यांना घराघरात वेगळी ओळख मिळाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जेठालालच्या भूमिकेबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मालिकेत जेठालालच्या भूमिकेचा स्क्रीनटाइम कमी केला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. कथानक आता नव्याने दाखल झालेल्या राजस्थानी कुटुंबाभोवती फिरणार असल्याचेही बोलले जात आहे. या कुटुंबात पती-पत्नी आणि त्यांची दोन मुले अशी चार प्रमुख पात्रे आहेत. पतीची भूमिका कुलदीप गोर, तर पत्नीची भूमिका धरती भट्ट साकारत आहेत. साड्यांचे दुकान चालवणाऱ्या या कुटुंबाची कथा प्रेक्षकांना आवडत असल्याने त्यावर अधिक भर दिला जाईल, अशी माहिती समोर आली.
मात्र, या चर्चांवर मालिकेच्या निर्मात्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आज तकशी बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या मालिकेचे कथानक जेठालालभोवतीच फिरत आहे आणि त्याची भूमिका कमी करण्याचा किंवा मालिकेतून हटवण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. २८ जुलै रोजी मालिकेचा १८ वा वर्धापन दिन साजरा होणार असून, त्यानिमित्त नवीन प्रोमोही प्रदर्शित करण्यात आला आहे.
दरम्यान, दयाबेनची व्यक्तिरेखा अद्याप मालिकेत परतलेली नसल्यामुळे जेठालाल-दयाबेनचा लोकप्रिय ट्रॅक पुढे नेता आलेला नाही. तसेच, अलीकडील भागांमध्ये नवीन राजस्थानी कुटुंब आणि बाघा-बावरी यांच्या कथानकावर अधिक भर दिल्याने जेठालालचा स्क्रीनटाइम तुलनेने कमी झाल्याचे प्रेक्षकांचे मत आहे.
सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनीही “दिलीप जोशी कुठे आहेत?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र, निर्मात्यांच्या स्पष्टीकरणानंतर जेठालालची व्यक्तिरेखा मालिकेत कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले असून, त्याच्या चाहत्यांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे.






