फोटो सौजन्य - Social Media
Ekta Kapoor यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या काही आयकॉनिक क्षणांची पुन्हा चर्चा रंगू लागली आहे. आपल्या मालिकांमधील जबरदस्त ट्विस्ट्स, लक्षवेधी व्यक्तिरेखा आणि ट्रेंडसेटर फॅशनमुळे त्यांनी छोट्या पडद्याला वेगळं स्थान मिळवून दिलं. त्यांच्या मालिकांनी केवळ टीआरपी गाजवला नाही, तर भारतीय पॉप कल्चरचाही महत्त्वाचा भाग बनल्या. चला तर पाहूया त्या पाच क्षणांकडे, ज्यांनी टेलिव्हिजनचा चेहरामोहरा बदलून टाकला.
सर्वात आधी आठवते ती Komolika ची स्टायलिश बिंदी. Urvashi Dholakia यांनी साकारलेल्या या व्यक्तिरेखेची ड्रामॅटिक एन्ट्री, खास बॅकग्राउंड म्युझिक आणि वेगळी फॅशन स्टाइल प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यानंतर अनेक मालिकांमधील व्हॅम्प पात्रांमध्ये कोमोलिकाची छाप दिसू लागली. यानंतर भारतीय टेलिव्हिजनला हादरवणारा प्रसंग म्हणजे Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi मधील Mihir Virani चा मृत्यू. या प्रसंगामुळे प्रेक्षक भावनिक झाले होते. देशभरातून मिहिरला परत आणण्याची मागणी झाली आणि अखेर निर्मात्यांना त्याची पुनरागमनाची कथा दाखवावी लागली.
तितकाच चर्चेत राहिलेला आणखी एक प्रसंग म्हणजे तुलसी विराणीने स्वतःच्या मुलाला गोळी मारणे. हा प्रसंग त्या काळातील सर्वात धाडसी आणि अनपेक्षित ट्विस्ट मानला गेला. यामुळे डेली सोप्समध्येही गुंतागुंतीचे आणि नैतिक प्रश्न उपस्थित करणारे विषय हाताळले जाऊ शकतात, हे सिद्ध झाले. Ekta Kapoor यांनी रोमँस दाखवण्याची पद्धतही बदलून टाकली. Kutumb आणि Kahiin To Hoga यांसारख्या मालिकांमधून वर्कप्लेस रोमँसला नवी ओळख मिळाली. त्या काळातील तरुण पिढीसाठी ऑफिसमधील प्रेमकथा हे एक वेगळंच आकर्षण बनलं.
शेवटी, Naagin मधून Mouni Roy यांच्या इच्छाधारी नागिन अवताराने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. त्यांच्या ग्लॅमरस साड्या, आकर्षक मेकअप आणि सुपरनॅचरल अंदाजामुळे ‘नागिन’ भारतीय टेलिव्हिजनमधील सर्वात लोकप्रिय फ्रँचायझींपैकी एक ठरली. आज अनेक वर्षांनंतरही एकता कपूर या भारतीय टेलिव्हिजनमधील संस्मरणीय क्षणांच्या प्रमुख शिल्पकार मानल्या जातात. कौटुंबिक ड्रामाला नवं रूप देण्यापासून ते ट्रेंडसेटर व्यक्तिरेखा घडवण्यापर्यंत, त्यांच्या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी छाप सोडली आहे.






