(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाने तब्बल दहा वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. लेखन आणि सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणारे निलेश साबळे हे या शोचे प्रमुख आकर्षण ठरले होते. मराठी कलाकारांसोबतच अनेक बॉलीवूड सुपरस्टार्सनीही या मंचावर हजेरी लावली होती. मात्र, दशकभरानंतर या कार्यक्रमाने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतल्याने विविध चर्चांना उधाण आले.
कार्यक्रम बंद झाल्यानंतर राशीभविष्यकार शरद उपाध्ये यांनी निलेश साबळे यांच्यावर टीका केली होती. त्यावर निलेश यांनीही ठाम शब्दांत प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर निलेश साबळे आणि भाऊ कदम यांनी हसताय ना…हसायलाच पाहिजे हा कार्यक्रम सुरू केला. या शोमध्ये ओंकार भोजने देखील सहभागी होता. मात्र, या कार्यक्रमाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही आणि तो अल्पावधीतच बंद करण्यात आला.
दरम्यान, निलेश साबळे यांनी अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर लाल रंगाच्या सूटमध्ये खुर्चीवर बसलेला आपला फोटो पोस्ट केला आहे. चष्मा घातलेला आणि विचारमग्न अवस्थेतील त्याचा हा फोटो लक्षवेधी ठरतो. या फोटोला त्याने, “नवा दिवस… नवा विचार… चला… काहीतरी नवीन करूया…!!!” असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
या पोस्टवर चाहत्यांनी उत्सुकता व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. “आतुरता…”, “काहीतरी करा… आम्ही वाट पाहतोय”, “तुम्ही काय नवीन करणार आहात? लवकर सांगा” अशा अनेक कमेंट्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. तसेच निलेश साबळेचा हा नवा प्रोजेक्ट काय असेल? असे प्रश्न चाहत्यांना पडत आहे. याआधी २०२५ मध्ये निलेश साबळे आणि भाऊ कदम यांनी उगाच अवॉर्ड्स या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. त्या वेळीही निलेश यांनी लवकरच काहीतरी नवीन घेऊन येणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आता ते कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






