बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन भाजप आमदार सुरेश धस यांचे धनंजय मुंडे व वाल्मिक कराडवर आरोप केले (फोटो - सोशल मीडिया)
बीड : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. या घटनेवरुन राज्यभरामध्ये रोष व्यक्त केला जात आहे. तसेच विधीमंडळामध्ये देखील या विषयांवर गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले होते. मात्र विरोधकांनी हे स्पष्टीकरण चुकीचे व पुरेसे नसल्याचे म्हणत आवाज उठवला होता. या प्रकरणावरुन भाजपचे सत्ताधारी आमदार सुरेश धस हे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधून बीडमधील कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर व खळबळजनक दावे केले आहेत.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाबाबत बोलताना आमदार धस म्हणाले की, “संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना १५ दिवसांचा पीसीआर मिळाला ही समाधानाची बाब आहे. सीआयडी अधिकाऱ्यांना तपास करण्याची संधी आता मिळेल. आयजींच्या दर्जाचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या दुर्दैवी आणि घाणेरड्या घटनेचा तपास करणार आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतलय आणि मुख्यमंत्र्यांची सही झाली. प्रचंड रोष एकट्या बीड जिल्ह्यात नाही, तर राज्यभरात लोकांच्या मनात आहे. काल सर्वपक्षीय बैठक सुद्धा बीडला झाली असून काही निर्णय झालेत. बीड जिल्हा एकवटेल असं चित्र आहे,” असे मत आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र राजकारणसबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सत्ताधारी आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधून बीडमध्ये कायदा व व्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याचे सांगितले आहे. आमदार सुरेश धस म्हणाले की, “बीड जिल्ह्यात कायदा राहिला नाही. कायदा-सुव्यस्था आहे की नाही हा प्रश्न पडला आहे. बीड जिल्ह्यात गँग्ज ऑफ वासेपूर सुरू आहे. पोलीस आरोपींच्या मागावर आहेत. आरोपी लवकरच अटक होतील अशी अपेक्षा आहे. आरोपी विष्णू चाटे हा आकासारखा छोटा आका आहे. पोलिसांनी पकडलं असं वाटत नाही, ते स्वत: सरेंडर झाले आहेत. यातला आका लवकरात लवकर आत गेला पाहिजे. हा आता 100 टक्के खंडणीचा गुन्हा राहिलेला नाही. 302 चे मुख्य सूत्रधार यामागे आहेत” असा मोठा दावा आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सुरेश धस यांनी महायुतीचे आमदार व बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत. सुरेश धस म्हणाले की, “बीडचे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारावा. किंवा अजित पवार जरी झाले तरी माझी हरकत नाही. मागच्या पालकमंत्र्यांनी त्यांचं पालकमंत्री पद भाड्याने दिलं होते बीडच्या आकाला मी घाबरत नाही. 9 तारखेला ही घटना घडली आणि आका त्याच परिसरात होता. आका 302 मध्ये देखील आहे. आका सध्या रिसॉर्ट बांधत आहे. शेतकऱ्यांना धमकी देऊन काम सुरू आहे. परळी येथील दुबे प्रकरणात देखील आका आहेत. किती लाखात मिटले मला माहीत आहे,” असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे.