'देर आए दुरुस्त आए'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्याच ज्येष्ठ नेत्याचा घरचा आहेर,(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशभरात राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. या घडामोडीवर भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनीही भाष्य करत “देर आए दुरुस्त आए” असे म्हणत सरकारला अप्रत्यक्ष टोला लगावला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन पूर्ण केल्याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदनही केले.
नीट परीक्षेशी संबंधित वादानंतर देशभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाले होते. विविध विद्यार्थी संघटनांसह कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन उभारले होते. हे आंदोलन अनेक दिवस सुरू राहिले. दरम्यान, संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान झालेल्या लाठीचार्जनंतर आंदोलन अधिक तीव्र झाले आणि विविध राजकीय पक्षांनीही विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला.
Big Breaking: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय; आता ‘हा’ नेता असणार देशाचा शिक्षण मंत्री
या सर्व घडामोडींनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यानंतर शिक्षण खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर मुरली मनोहर जोशी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली.
Better late than never. Shri Dharmendra Pradhan has submitted his resignation. I hope that the Prime Minister will also take an immediate and timely decision. I appreciate and congratulate all the students for their peaceful conclusion to the movement. I hope that now peace will… — Dr. Murli Manohar Joshi (@DrMurliManohar_) July 25, 2026
जोशी यांनी आपल्या संदेशात म्हटले की, “धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी योग्य निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे. त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करत त्यांच्या संयमित आणि शांततापूर्ण भूमिकेचे कौतुक केले. शिक्षण क्षेत्रात स्थैर्य निर्माण होऊन विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्य घडविण्याच्या अधिक संधी उपलब्ध होतील,” अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने सरकारने त्यांच्या तीन प्रमुख मागण्या मान्य केल्या गेल्या आहेत. या मागण्यांमध्ये केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा, आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल न करणे आणि संबंधित घटनांमध्ये मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचा समावेश असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सुरू झालेल्या या नव्या राजकीय घडामोडींमुळे विविध स्तरांवर चर्चा रंगल्या आहेत. मुरली मनोहर जोशी यांच्या प्रतिक्रियेमुळे या प्रकरणाला आणखी राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून, सरकारच्या पुढील निर्णयांकडे तसेच शिक्षण क्षेत्रातील आगामी धोरणात्मक बदलांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






