संग्रहित फोटो
आळेफाटा : हातात रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या, खांद्यावर कचरा गोळा करण्याची पोती आणि चेहऱ्यावर निष्पाप भाव…पाहणाऱ्याला त्या केवळ कचरा वेचणाऱ्या महिला वाटाव्यात. मात्र या महिलांच्या हालचालींमागे सुरू होता एक धक्कादायक डाव. बंद घरांची रेकी करून संधी मिळताच घरफोडी करण्याचा उद्योग करणाऱ्या महिलांच्या टोळीचा आळेफाट्यात पर्दाफाश झाला आहे. आळेखिंड परिसरातील समाधान हॉटेलच्या पाठीमागील भागात दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. नागरिकांच्या जागरूकतेमुळे चोरीचा डाव फसला आणि दोन महिलांना मुद्देमालासह पकडण्यात यश आले आहे.
संतवाडी शिवारातील भामाबाई सोनभाऊ निमसे यांच्या घराला कुलूप असल्याचे पाहून चार जणांच्या टोळीने घराला लक्ष्य केले. तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश असलेल्या या टोळीने दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील जुनी तांब्या-पितळेची भांडी, बंब आणि इतर साहित्य पोत्यांमध्ये भरले जात होते. दरम्यान, बंद घरातून काही हालचाल आणि आवाज ऐकू आल्याने भामाबाई यांना संशय आला. त्यांनी खिडकीतून पाहणी केली असता, कचरा वेचण्याच्या बहाण्याने फिरणाऱ्या महिला घरातील साहित्य गोळा करत असल्याचे दिसून आले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आरडाओरड केली.
‘कचरा वेचणाऱ्या’ नव्हे तर घरफोडीची रेकी करणाऱ्या!
ही टोळी परिसरात अनेक दिवसांपासून फिरताना दिसत होती. हातात रिकाम्या बाटल्या आणि कचऱ्याची पोती असल्यामुळे कोणीही त्यांच्याकडे संशयाने पाहत नव्हते. मात्र बंद घरांवर नजर ठेवून योग्य संधी साधण्याची त्यांची पद्धत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घर बंद असल्याची खात्री झाल्यानंतर लोखंडी हत्याराच्या सहाय्याने दरवाजा फोडून चोरी केली जात होती.
नागरिकांची तत्परता ठरली निर्णायक
भामाबाई यांच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिक तत्काळ घटनास्थळी धावून आले. चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र नागरिकांनी पाठलाग करून दोन महिलांना शिताफीने पकडले. तर एका महिलेसह एक पुरुष पसार होण्यात यशस्वी झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सुमारे दीड लाख रुपये किमतीची तांब्या-पितळेची भांडी व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून या टोळीने परिसरात यापूर्वीही अशाच प्रकारच्या चोरी केल्या आहेत का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. कचरा वेचण्याच्या आडून घरांवर नजर ठेवणाऱ्या या टोळीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अनोळखी व्यक्तींबाबत सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.






