मनोज जरांगे पाटील यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा गाजला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आरक्षणासाठी त्यांनी अंतरवली सराटी ते मुंबई असा मोर्चा काढला आहे. मुंबईमधील आझाद मैदानावर जरांगे पाटील हे आंदोलन करणार आहेत. या संपूर्ण आंदोलनामध्ये जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहिले आहेत. अगदी जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख केला आहे. यानंतर आता भाजप नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांची पाठराखण केली आहे.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय विषयांवर भाष्य केले. बावनकुळे यांनी मराठी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. बावनकुळे म्हणाले की, आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक मराठा समाजाचे नेते झाले आहेत. मात्र मराठा समाजाला कोणीही आरक्षण देऊ शकले नाही. मराठा समाजाला पहिल्यांदाच आरक्षण देण्याचे काम देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्येही मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर जरांगे पाटील हे फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसतात. यावरुन चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त करत मत व्यक्त केले. बावनकुळे म्हणाले की, “आजही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी फडणवीस सरकार सकारात्मकच आहे. मात्र, फडणवीस यांच्यावर जरांगे पाटील हे वारंवार टीका करत आहेत. केवळ देवेंद्र फडणवीस ब्राहाण समाजाचे आहेत म्हणून त्यांच्यावर ही टीका होत आहे का? ते मराठा असते तर तुम्ही कशी टीका केली असती का?” असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
मराठा आरक्षणासाठी भाजप सरकारने अनेकदा प्रयत्न केले
पुढे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “राज्यामध्ये गणेशोत्सव सणाचा मोठा उत्साह आहे. प्रत्येकाच्या घरोघरी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. अशा काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करणं आणि मोर्चा काढणं हे बरोबर नाही. सरकारकडे विविध मागण्या करणे आणि त्यासाठी आंदोलन करण्याला कोणाचाही विरोध नाही. मात्र मोर्चाची वेळ बदलता आली असती. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजप सरकारने अनेकदा प्रयत्न केले आहेत. त्यांच्या आरक्षणासाठी आमचे पूर्ण समर्थन आहे,” अशी स्पष्ट भूमिका भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे बावनकुळे म्हणाले की, “मराठा समाजाला आरक्षण देण्याचा पूर्ण प्रयत्न आहे. मात्र असे देताना इतर सामाजाला किंवा ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना 2014 ते 2019 च्या काळामध्ये देखील मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे सरकार असताना देखील मराठा समाजाला आरक्षण दिले. आजही मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशीच आमची भूमिका आहे,” असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.