मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसे नेते राज ठाकरे यांची खास सोशल मीडिया पोस्ट केली (फोटो - एक्स)
मनसे नेते राज ठाकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मराठी भाषिकांसाठी खास पोस्ट लिहिली आहे. यामध्ये राज ठाकरेंनी लिहिले आहे की, “आज मराठी भाषा गौरव दिवस. सर्वप्रथम सर्व मराठी भाषिकांना आणि जे मराठी भाषिक नाहीत पण जे मराठी भाषेचा इथे राहून आदर करतात आणि बोलतात किंवा बोलायचा प्रयत्न करतात त्यांना देखील मनःपूर्वक शुभेच्छा. आजच्या दिवसाची ही पोस्ट लिहिताना गेले काही दिवस सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दल जी चर्चा सुरु आहे, त्याचे संदर्भ आहेत. त्यात दिल्लीत एआय परिषद झाली त्या सगळ्याचे संदर्भ पण डोक्यात घोळत होते. त्यातच अँथ्रोपिकच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीने जगभरात जी घुसळण सुरु केली आहे. त्या अँथ्रोपिकचा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री. राहुल पाटील ही मराठी व्यक्ती आहे ही पण बाब महत्वाची होतीच . या निमित्ताने कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील लोकांशी चर्चा केली, त्यांचं म्हणणं समजवून घेतलं आणि त्यातून जे जाणवलं ते आज मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने मांडत आहे,” असे राज ठाकरेंनी लिहिले आहे.
हे देखील वाचा : काँग्रेस राज्यसभेसाठी शरद पवारांना धक्का देणार? काँग्रेसकडून ‘या’ नावाची चर्चा सुरु
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “आज फक्त मराठीच नाही तर जगातील सगळ्याच स्थानिक भाषा ज्यांना स्वतःची लिपी आहे अशा सगळ्यांसाठी एक खूप मोठी संधी आहे. मध्यंतरी मला काही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणाली दाखवल्या. त्या बघितल्यावर एक लक्षात आलं ते म्हणजे आता ज्ञान मिळवायला किंवा व्यक्त व्हायला किंवा अर्थार्जन करायला या प्रणालींचा हवा तसा वापर करणं शक्य आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तुमची मातृभाषा उत्तम येत असेल तरी तुम्ही मागे पडू शकत नाही. दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला आणि त्यानंतर जमीन ही मोठी शक्ती ठरली. औद्योगिक क्रांतीनंतर मशिन्स ही मोठी शक्ती वाटायला लागली. जसं डिजिटल युग सुरु झालं तसा डेटा शक्तिवान ठरला आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात हा डेटा ज्या भाषांमधून तयार होईल त्या भाषा शक्तिशाली ठरतील. आणि म्हणूनच माझे महाराष्ट्र सैनिक असोत की इतर मराठी जनांनी, मराठी भाषेतून अतिप्रचंड पण उत्तम दर्जाचा डेटा तयार होईल हे बघितलं पाहिजे,’ अशी भूमिका राज ठाकरेंनी व्यक्त केली.
हे देखील वाचा : राज्यात ‘Love jihad’ विरोधात कडक कायदा येणार!रश्मी शुक्ला समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात
पुढे त्यांनी लिहिले की, “यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात समाज माध्यमांवर मराठीमध्ये व्यक्त व्हा. तुम्ही ज्या क्षेत्रांत तज्ज्ञ असाल त्याचे मराठीत ब्लॉग्स सुरु करा, मराठी पॉडकास्टस सुरु करा. कम्प्युटरवर कोडिंग करण्यापासून ते मराठी भाषिकांनी सुरु केलेले डिजिटल विश्वकोश तयार होऊ देत. शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता विषय, ती प्रणाली कशी हाताळायची हे सगळं मराठीत मुलांना शिकवलं जावं. या सगळ्यातून मराठी भाषा ही डिजिटल जगातील ज्ञानाची वाहक बनेल आणि जितका मोठा डेटा (विदा ) या सगळ्या कृत्रिम बुद्धी प्रणालींना मिळेल तितकी ही सर्व सॉफ्टवेअर्स उत्कृष्ट संधी मराठीत उपलब्ध करून देतील. आपण मराठी भाषा आणि मराठी प्रांत याच्या सार्वभौमत्वासाठी आवाज उठवत आलो आहोत, आता या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मराठी भाषेतून ज्ञान मिळ्वण्याबाबतचं सार्वभौमत्व मिळवणं शक्य आहे. ही संधी सोडू नका,” असे आवाहन राज ठाकरेंनी केले.
आज मराठी भाषा गौरव दिवस. सर्वप्रथम सर्व मराठी भाषिकांना आणि जे मराठी भाषिक नाहीत पण जे मराठी भाषेचा इथे राहून आदर करतात आणि बोलतात किंवा बोलायचा प्रयत्न करतात त्यांना देखील मनःपूर्वक शुभेच्छा. आजच्या दिवसाची ही पोस्ट लिहिताना गेले काही दिवस सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दल… pic.twitter.com/ClUI3rJrwm — Raj Thackeray (@RajThackeray) February 27, 2026
“तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक नोकऱ्या कमी होतील अशी भीती सर्वत्र बोलली जात आहे. ती सार्थ असेल देखील. पण नक्की काय घडेल याचा अचूक अंदाज कोणीच व्यक्त करू शकत नाही. पण एक असं तंत्रज्ञान तुमच्या हातात आलं आहे जे आत्मसात केलं तर पारंपरिक उधोगधंद्यात काहीसा मागे पडलेला मराठी माणूस स्वतःच खूप मोठं साम्राज्य उभं करू शकेल. आज जगातील अनेक बलाढ्य कंपन्या या गेल्या २० /३० वर्षांत उभ्या राहिल्या आहेत आणि ते जी संपत्ती निर्माण करत आहेत ते १०० वर्ष जुन्या उद्योगसमूहांना पण शक्य होत नाही. त्यासाठी डिजिटल जगात मराठी मोठ्या प्रमाणावर उमटेल हे पहा. समाज माध्यमांवर मराठीत टीका, द्वेष पसरवण्यापेक्षा नवीन सकारात्मक माहिती टाका. तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा,” अशा शुभेच्छा मनसे नेते राज ठाकरे यांनी दिल्या आहेत.






