आमदार रोहित पवार यांनी पोलीस प्रशासनासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा
पुण्यातील विषारी दारूकांडात १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने राज्यात खळबळ उठली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत संबंधित आरोपीना सोडणार नसल्याचे सांगत याचा तपास सीआयडी कडे देणार असल्याचे सांगितले आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पोलीस प्रशासनासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “पुण्यातील विषारी दारुकांडाचा तपास पुणे पोलिसांच्या ‘मुखिया’ला जमणार नसल्याचं लक्षात आल्यानेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याचा तपास CID कडे देण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय,” अश्या शब्दांत त्यांनी आगपाखंड केली आहे.
रोहित पायावर यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून जोरदार निशाणा साधला आहे. ते यावेळी म्हणाले, “पुण्यातील विषारी दारुकांडाचा तपास पुणे पोलिसांच्या ‘मुखिया’ला जमणार नसल्याचं लक्षात आल्यानेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याचा तपास CID कडे देण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय. CID कडे तपास दिल्यास काय परिस्थिती होते हे अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासावरून दिसतंच आहे, पण किमान चोऱ्यामाऱ्या, पाकिटमारी, चेन स्नॅचिंग अशा प्रकारच्या छोट्या गुन्ह्यांचा तपास CID करेल असं वाटल्यानेच कदाचित त्यांच्याकडे हा तपास दिला असावा किंवा अजितदादांच्या अपघाताप्रमाणे या दारूकांडातही कुणालातरी वाचवण्याचा यामागे काही हेतू नाही ना, हेही तपासण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.
पुण्यातील विषारी दारुकांडाचा तपास पुणे पोलिसांच्या ‘मुखिया’ला जमणार नसल्याचं लक्षात आल्यानेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याचा तपास CID कडे देण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय. CID कडे तपास दिल्यास काय परिस्थिती होते हे अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासावरून दिसतंच आहे,
पण किमान… — Rohit Pawar (@RRPSpeaks) May 30, 2026
ते पुढे म्हणाले, “पण आमचंही हेच मत आहे की, राज्य सरकारने यापुढे पोलीस ठाणे वसुलीसाठी राखीव ठेवून चोऱ्यामाऱ्या, पाकिटमारी, चेन स्नॅचिंग यांसारख्या गुन्ह्यांच्या तपासाचं काम CID कडेच सोपवावं आणि अजितदादांच्या अपघाताचा तपास विधानसभेत दिलेल्या शब्दाप्रमाणे CID कडून काढून CBI कडे द्यावा. यामुळं किमान अजितदादांना तरी न्याय मिळेल..”
“खरं म्हणजे काही पोलिसांमुळे बहुतांश प्रामाणिक पोलिसांची बदनामी होते, हे कुणी लक्षात घेत नाही. त्यामुळं मराठी माणूस म्हणून मला पोलिसांनाही विचारायचं की, किती दिवस तुम्ही हे असं दबावाखाली काम करणार? कधीतरी #मराठी_बाणा दाखवून पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलिसांची मान अभिमानाने उंचावेल असं काम करणार की नाही?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. ते म्हणाले, “माझे पुणे पोलीस आयुक्तांशी बोलणे झाले आहे. विषारी दारू कुठे तयार झाली ते शोधून काढले आहे. आतापर्यंत आठ लोकांना अटक झाली आहे. अजून काही लोकांना अटक होऊ शकते. या प्रकरणातील संपूर्ण साखळी शोधून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल,” असे ते म्हणाले.






