जयंत पाटील-एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
राज्याच्या राजकारणात आता मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात होणाऱ्या नव्या बदलांच्या अनुषंगाने राज्यातील राजकीय वातावरणात घडामोडीना वेग आला आहे. अश्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चाना उधाण आले आहे. आधी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची घटना ताजी असतानाच आता एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने महाविकास आघाडीमध्येही तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे समजत आहे.
जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘नंदनवन’ निवासस्थानी भेट घेतल्याने या चर्चांना आणखी उधाण आले. अशातच, शिवसेना उद्भव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली असून राज्यातील महाविकास आघाडीच्या भविष्याबाबत मोठे विधान केले आहे.
संजय राऊतांना एकनाथ शिंदे – जयंत पाटील यांच्या भेटीविषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “”ज्या लोकांची तुम्ही नावं घेतली, उद्या हेच लोक जर रामदास आठवले यांना भेटले, तर ते त्यांच्या पक्षात जात आहेत असे म्हणणार का? देशात आणि राज्यात विविध पक्षांचे नेते एकमेकांना भेटत असतात. अशा भेटींवरून कोणत्याही पक्षात प्रवेश किंवा राजकीय समीकरणे बदलली, असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. जयंत पाटील असोत किंवा जितेंद्र आव्हाड, ते विविध पक्षांच्या नेत्यांना भेटत असतात. ते ‘फ्री बर्ड्स’ आहेत. त्यामुळे या भेटींमागे वेगळा अर्थ काढण्याचे कारण नाही,” असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
ठाकरे गटाच्या नागपूर येथील प्रस्तावित रामरक्षा आंदोलनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यावर भाजप नेते नितेश राणे आणि इतर नेत्यांनी टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री हे फक्त एका पक्षाचे नसतात, ते संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात.”
संजय राऊत यांनी भाजपसोबतच्या जुन्या युतीचीही आठवण करून दिली. ते म्हणाले, “आता आमचे राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरी आम्ही सलग 25 वर्षे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे आम्ही निमंत्रण दिल्याबद्दल टीका करणे योग्य नाही. त्यामुळे त्यांनी अश्या प्रतिक्रिया देणं “मूर्खपणा” आहे,” असे राऊत म्हणाले.






