सातारा पालिकेत सत्ताधाऱ्यांचाच रणसंग्राम! बनकर-खंदारे वादाने सभागृह तापले, दोन तासांच्या गदारोळात 15 विषय मंजूर
सातारा : सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आला. उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर आणि बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे यांच्यातील जोरदार शाब्दिक युद्धामुळे सभागृह अक्षरशः रणांगण बनले. आरोप, टोलेबाजी, अरे-तुरेची भाषा आणि सततच्या हस्तक्षेपामुळे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्यासमोर सभेचे कामकाज सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले.
सभेच्या प्रारंभीच विषय मंजुरीच्या पद्धतीवरून खंदारे यांनी उपनगराध्यक्ष बनकर यांच्यावर थेट निशाणा साधत “सभागृहात लोकशाहीची गळचेपी सुरू आहे” असा गंभीर आरोप केला. “विषयांचे वाचन न करता मंजुरीचा सपाटा लावला जातो. ही हुकूमशाही आम्ही चालू देणार नाही,” असा आक्रमक इशारा त्यांनी दिला. त्यावर बनकर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिल्याने वातावरण क्षणात तापले.
दोन्ही नेत्यांमधील वाद इतका वाढला की काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी वारंवार हस्तक्षेप करत “सभागृहाची प्रतिष्ठा राखा” असे आवाहन केले. मात्र आरोप-प्रत्यारोपांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नव्हते. काही नगरसेवकांनी तर बनकर यांच्या कार्यशैलीची तुलना थेट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शैलीशी करत सभागृहात खसखस पिकवली.
दरम्यान, नगरसेविका हेमलता ननावरे यांनी शाहूनगरमधील पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. त्यावर खंदारे यांनी “अधिकार नसलेल्या लोकांकडे अर्ज करून उपयोग नाही, थेट मुख्याधिकाऱ्यांकडे जा,” असा टोला लगावत पुन्हा बनकर यांना लक्ष्य केले.
सभेत आणखी एक वादग्रस्त मुद्दा तेव्हा निर्माण झाला, जेव्हा एका नगरसेविकेने मागील सभेत नगरसेवकांवर करण्यात आलेल्या आरोपांबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. “पुरावे नसताना बदनामी का केली?” असा सवाल करत त्यांनी संतप्त भूमिका घेतली. विभागीय चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर संबंधितांची वेतनवाढ रोखली जाईल, असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले. मात्र समाधान न झाल्याने संबंधित नगरसेविकेने सभात्याग केला.
सभेत ‘नारीवंदन विधेयका’च्या समर्थनार्थ ठराव मांडण्यात आला. नगरसेविका सिद्धी पवार, हेमलता भोसले आणि सावित्री बडेकर यांनी महिला सक्षमीकरणावर जोर देत विरोधी प्रवृत्तींचा निषेध केला. यावेळी सिद्धी पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “आपत्कालीन बचत” संकल्पनेचा उल्लेख करत नागरिकांनी आर्थिक शिस्त अंगीकारावी, असे आवाहन केले. माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांनी आस्थापना विभागातील पदोन्नती प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत काही महत्त्वाची कागदपत्रे गायब झाल्याचा आरोप केला. याबाबत संपूर्ण माहिती सभागृहासमोर मांडली जाईल, असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले. पाणीटंचाईच्या मुद्द्यावरूनही प्रशासनावर जोरदार टीका झाली. नगरसेवक सुशांत महाजन यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप करत तातडीची बैठक घेण्याची मागणी केली. त्यावर नगराध्यक्ष मोहिते यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खरमरीत नोटीस देण्याचे आदेश दिले.
वाद, टोलेबाजी आणि आरोपांच्या धुरळ्यात तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत अखेरीस १५ विषयांना मंजुरी देण्यात आली. तसेच शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी पुढील पाच वर्षांसाठी १५ सदस्यीय वृक्ष समितीची घोषणाही करण्यात आली.






