Goa Foundation Day : २६ वर्षांचा संघर्ष अन् भारताचे २५ वे राज्य! जाणून घ्या 'गोवा स्थापना दिवसाचा' रंजक इतिहास आणि पोर्तुगीजांच्या तावडीतून सुटकेची संपूर्ण गाथा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Goa Statehood Day 30 May 2026 : भारताच्या नकाशावरील अत्यंत सुंदर, निसर्गरम्य आणि पर्यटकांचे नंदनवन मानले जाणारे ‘गोवा’ राज्य दरवर्षी ३० मे रोजी आपला स्थापना दिवस (Goa Statehood Day) अत्यंत उत्साहात साजरा करते. आजच्याच दिवशी, म्हणजेच ३० मे १९८७ रोजी गोव्याला अधिकृतपणे भारतीय प्रजासत्ताकाचे २५ वे पूर्ण राज्य म्हणून घोषित करण्यात आले होते. हा दिवस केवळ एका भौगोलिक राज्याची निर्मिती दर्शवत नाही, तर पोर्तुगीजांच्या साडेचारशे वर्षांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाल्यानंतर स्वाभिमानाने आणि लोकशाही मार्गाने स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या गोमंतकीय जनतेच्या प्रदीर्घ संघर्षाचा तो एक सुवर्ण इतिहास आहे.
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले खरे, परंतु गोव्या नशिबी तो सूर्योदय अजून आला नव्हता. भारताचा मुख्य भूभाग स्वतंत्र झाला तरी गोव्यावर पोर्तुगीजांचे राज्य कायम होते. पोर्तुगीजांनी गोव्यावर तब्बल ४५१ वर्षे राज्य केले. अखेर, भारतीय सशस्त्र दलांनी १९ डिसेंबर १९६१ रोजी ‘ऑपरेशन विजय’ (Operation Vijay) राबवून गोव्याला पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त केले. म्हणूनच दरवर्षी १९ डिसेंबर हा दिवस ‘गोवा मुक्ती दिन’ (Goa Liberation Day) म्हणून साजरा केला जातो. मात्र, मुक्त झाल्यानंतरही गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला नव्हता, तर तो दमन आणि दीव सोबत मिळून एक केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखला जाऊ लागला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Blue Origin: जेफ बेझोस यांच्या अब्जावधींच्या ‘न्यू ग्लेन’ रॉकेटचा भीषण स्फोट; इलॉन मस्क यांची प्रतिक्रिया लक्षवेधी, VIDEO VIRAL
गोवा मुक्त झाल्यानंतर एका मोठ्या राजकीय प्रश्नाने डोके वर काढले होते- गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करावे की नाही? १९६७ मध्ये गोव्याच्या भविष्यासाठी एक ऐतिहासिक ‘जनमत कौल’ (Opinion Poll) घेण्यात आला. भारतातील हा एकमेव असा जनमत कौल होता, ज्यामध्ये गोमंतकीय जनतेने महाराष्ट्रात सामील होण्यास नकार दिला आणि आपली स्वतंत्र ओळख कायम ठेवण्याच्या बाजूने कौल दिला. या निर्णयामुळे गोव्याची स्वतंत्र संस्कृती, कोंकणी भाषा आणि अस्मिता टिकून राहिली. हा काळ गोव्याच्या राजकीय परिपक्वतेचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
केंद्रशासित प्रदेश म्हणून अनेक वर्षे काढल्यानंतर, गोव्याच्या विकासाचा वेग आणि तेथील जनतेची मागणी लक्षात घेऊन भारतीय संसदेने गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. ३० मे १९८७ रोजी गोव्याचे विभाजन करून दमन आणि दीव केंद्रशासित प्रदेश म्हणून वेगळे ठेवण्यात आले, तर गोव्याला भारताचे २५ वे स्वतंत्र राज्य बनवण्यात आले. पणजी ही गोव्याची राजधानी बनली आणि कोंकणी भाषेला राजभाषेचा अधिकृत दर्जा मिळाला. यामुळेच ३० मे हा दिवस गोव्यासाठी खऱ्या अर्थाने राजकीय आणि घटनात्मक स्वातंत्र्याचा दिवस ठरला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BSF India : 10 मिनिटांचा ‘खेळ’ अन् भारतात एंट्री; बांगलादेशी घुसखोरांनी स्वतःच उघड केले सीमेवरील दलालांचे धक्कादायक रॅकेट
आज गोवा हे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथील सोनेरी वाळूचे समुद्रकिनारे, प्राचीन चर्च, मंदिरे, आणि पोर्तुगीज स्थापत्यकलेचा वारसा पर्यटकांना भुरळ पाडतो. गोव्याची खाद्यसंस्कृती, विशेषतः सी-फूड आणि पारंपरिक संगीत हे या राज्याचे वैभव आहे. गोवा स्थापना दिनाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, परेड आणि शासकीय समारंभांचे आयोजन केले जाते. हा दिवस प्रत्येक गोवेकराला आपल्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देतो आणि राज्याला प्रगतीच्या पथावर पुढे नेण्याची नवी ऊर्जा देतो.






