बांगलादेशच्या विरोधात पडली मतं(फोटो-सोशल मीडिया)
Votes against the Bangladesh team : बांगलादेशचा भारत आणि श्रीलंकेत आयोजित करण्यात येणाऱ्या टी२० विश्वचषकामध्ये भारतात खेळण्याबाबत अजूनही वाद मिटलेला नाही. या दरम्यान बांगलादेशला या स्पर्धेतून वगळले जाऊ शकते. बांगलादेशने भारतात जाण्यास नकार दिला तर आयसीसी बोर्डाने बदली संघ पाठविण्यास मतदान करण्यात आले आहे. अशी बातमी समोर आली आहे की, आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला बांगलादेश सरकारला कळविण्यास सांगितले आहे की जर बांगलादेश २०२६ च्या टी२० विश्वचषकात सामने खेळण्यासाठी भारतात जाण्यास नकार देत असेल तर, तर बदली संघ स्पर्धेत पाठवण्यात येईल. त्यानंतर बहुसंख्य आयसीसी बोर्ड सदस्यांकडून बदली संघ पाठविण्याच्या बाजूने मतदान करण्यात आले आहे.
यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून भारतात टी२० विश्वचषक खेळण्यास बांगलादेशच्या नकाराचे समर्थन करण्यात आले आहे. आयसीसीला पाठवलेल्या पत्रात बांगलादेशचे सामने आयोजित करण्याची ऑफर देण्यात आली आहे. आयसीसी बोर्डाची आज बैठक पार पडली जिथे बांगलादेशच्या टी२० विश्वचषकात सहभागाबाबत निर्णय घेण्यासाठी मतदान देखील झाले.
बीसीबीला भारतात खेळण्याबाबतच्या भूमिकेबाबत आयसीसीला उत्तर देण्यासाठी एका दिवसाची मुभा देण्यात आली आहे. जर बांगलादेश भारतात न खेळण्याच्या भूमिकेवर ठाम राहिला तर स्कॉटलंड विश्वचषकाच्या गट क मध्ये बांगलादेशची जागा घेऊ शकतो. युरोपियन पात्रता फेरीत नेदरलँड्स, इटली आणि जर्सी यांच्या मागे राहिल्याने स्कॉटलंडला २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवता आली नाही.
बांगलादेश संघाचे गट टप्प्यातील सर्व चार सामने भारतात खेळवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे, पहिले तीन कोलकाता आणि एक सामना मुंबईत खेळला जाणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या सरकारच्या पाठिंब्याने भारतात जाण्यास नकार दिला असून त्यांचे सामने श्रीलंकेत खेळवण्याची मागणी करण्यात आलेली आहे. पीसीबीच्या एका सूत्राकडून सांगण्यात आले आहे की, “पीसीबीने ईमेलमध्ये म्हटले आहे की बांगलादेश क्रिकेट बोर्डाची मागणी वैध असून ती मान्य करण्यात यावी आणि जर बांगलादेशचे सामने श्रीलंकेत हलवण्यात काही समस्या असतील तर पाकिस्तान त्यांचे सर्व सामने आयोजित करण्यास तयार आहे.”
हेही वाचा : WPL 2026 : दिल्लीच्या फलंदाजाला पंचांशी वाद भोवला! ‘या’ खेळाडूला ठोठावण्यात आली मोठ्या दंडासह शिक्षा
आयसीसी आणि बीसीबीने या मुद्द्यावर खूप वेळा चर्चा केली असली तरी त्यामधून काही एक साध्य झालेले नाही. आयसीसीने स्पर्धा वेळापत्रकानुसारच होईल असे म्हटले आहे, तर बीसीबी भारतात संघ न पाठवण्याच्या निर्णयावर ठाम भूमिका घेऊन बसला आहे.






