इंग्लंडचे 'हे' ५ खेळाडू एकहाती फिरवू शकतात सामन्याचा निकाल (Photo Credit- X)
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू विल जॅक्स सध्या स्वप्नवत फॉर्ममध्ये आहे. त्याच्या फिरकीने फलंदाजांना भंडावून सोडले असून बॅटनेही त्याने खोऱ्याने धावा ओढल्या आहेत. आतापर्यंत ७ सामन्यांत १७६ च्या स्फोटक स्ट्राईक रेटने त्याने १९१ धावा केल्या आहेत, तर गोलंदाजीत ७ बळी टिपले आहेत. वानखेडेच्या खेळपट्टीवर जॅक्सची अष्टपैलू खेळी भारताचे समीकरण बिघडू शकते.
इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक हा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. सुपर-८ फेरीत पाकिस्तानविरुद्ध त्याने ठोकलेले झंझावाती शतक टीम इंडियासाठी धोक्याची घंटा आहे. ७ सामन्यांत १६१ च्या स्ट्राईक रेटने २२८ धावा करणाऱ्या ब्रूकमध्ये एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. मधल्या षटकांत त्याला रोखणे भारतीय गोलंदाजांसमोर मोठे आव्हान असेल.
सलामीवीर फिल साल्ट जरी या स्पर्धेत मोठी धावसंख्या उभारू शकला नसला (७ सामन्यांत १२५ धावा), तरी पॉवरप्लेमध्ये तो अत्यंत धोकादायक ठरतो. साल्टने जर इंग्लंडला आक्रमक सुरुवात करून दिली, तर भारतीय फिरकीपटूंवर दडपण येऊ शकते. त्याची आक्रमक शैली सुरुवातीच्या षटकांत भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते.
अनुभवी लेग-स्पिनर आदिल रशीदला भारतीय फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करणे नेहमीच आवडते. टी-२० फॉरमॅटमध्ये भारताच्या विरोधात रशीदची इकॉनॉमी अवघी ७.५० इतकी आहे. भारत-इंग्लंड टी-२० संघर्षात तो सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज आहे (१८ सामन्यांत १४ बळी). चालू विश्वचषकात भारतीय फलंदाज फिरकीसमोर चाचपडत असताना रशीदचा स्पेल निर्णायक ठरेल.
वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने ७ सामन्यांत १० बळी घेत आपली लय गवसल्याचे दाखवून दिले आहे. आर्चरने आयपीएलमध्ये ‘मुंबई इंडियन्स’कडून खेळताना वानखेडे स्टेडियमवर बराच वेळ घालवला आहे. येथील खेळपट्टी आणि वातावरणाचा त्याला सखोल अनुभव आहे. हाच अनुभव भारताच्या अव्वल फळीतील फलंदाजांसाठी घातक ठरू शकतो.






