अमित शहा पश्चिम बंगाल दौऱ्यावर (फोटो- सोशल मीडिया)
घुसखोरांचे नाव काढले असल्याने ममता बॅनर्जी त्रस्त
अमित शहांची बंगालमध्ये परिवर्तन यात्रा
भाजप कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यावर भाष्य
कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. बंगालमध्ये सत्ता आणण्यासाठी भाजप व आपली सत्ता कायम राखण्यासाठी ममता बॅनर्जी प्रयत्नशील असणार आहेत. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मथुरापुर येथून परिवर्तन यात्रेला सुरुवात केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
अमित शहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यावर टीका केली. मतदार यादीतून घुसखोरांचे नाव काढले जात आहे त्यामुळे ममता बॅनर्जी यांना त्रास होत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार आल्यास एका-एका घुसखोराला हाकलून दिले जाईल. अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांवर जाळल्या हल्ल्याचा देखील उल्लेख केला.
‘ममता दीदींना वाटते यांच्या दहशतीमुळे भाजप घाबरेल. मात्र मी आज मथुरापुरमधून सांगतो, एकदा भाजपचे सरकार बनवा. आम्ही ममता बॅनर्जींच्या गुंडांना उलटे टांगून सरळ करण्याचे काम करू. सर्वांना जेलमध्ये टाकण्यात येईल,’ असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.
ममता बॅनर्जी यांचे ध्येय बंगालच्या जनतेचे कल्याण नसून, अभिषेक बॅनर्जी यांना मुख्यमंत्री करण्याचे आहे. त्यांनी आपल्या भाषणात राज्यात झालेल्या विविध घोटाळ्यांचा उल्लेख केला. या घोटाळ्यांना संरक्षण देणारे डीजीपी यांना ममता बॅनर्जी राज्यसभेवर पाठवत आहेत, अशी टीका अमित शहा यांनी केली.
SIR मुळे 107 लोकांचा अंत?
पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. मात्र त्यापूर्वी एसआयआर प्रक्रिया सुरु करण्यात आली असून यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. एसआयआर प्रक्रियेवरुन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले आहे. यावरुन पश्चिम बंगाल विधानसभेत देखील हालचाली सुरु झाल्या आहेत. पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, राज्यात विशेष सघन सुधारणा (SIR) मुळे निर्माण झालेल्या भीती आणि चिंतेमुळे १०७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्य सरकारच्या या दाव्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीत सुधारणा करण्यासाठी SIR प्रक्रिया सुरू आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा आरोप आहे की, या प्रक्रियेमुळे सामान्य जनतेमध्ये व्यापक भीती निर्माण झाली आहे. ही NRC चा एक प्रकार असून यामध्ये नावे मतदार यादीतून वगळली जातील आणि त्यांच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाईल अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.






