(फोटो सौजन्य - AI)
इंधनाच्या किमती वाढल्या तर सर्वात पहिला आणि मोठा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. पेट्रोल आणि डिझेल महाग झाल्यामुळे वाहन चालवणे अधिक खर्चिक होऊन जाते. जेव्हा वाहतूक महाग होते, तेव्हा जीवनावश्यक वस्तूंसोबतच प्रत्येक गोष्टीच्या किंमती वाढतात आणि महागाईचा आणखीनच आणखी वाढत जाते. अशा परिस्थितीत, नवीन वाहन खरेदी करण्यापूर्वी ग्राहक अधिक विचार करतात. ज्यामुळे बाजारपेठेत गाड्यांची मागणी कमी होऊन जाते. ग्राहकांव्यतिरिक्त, ऑटोमोबाईल कंपन्यांनाही मोठ्या चॅलेंजसचा सामना करावा लागतो. वाहन निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या अनेक वस्तू, जसे की प्लास्टिक, रबर, सिंथेटिक फायबर, पेंट आणि विविध रसायने या सर्व गोष्टी देखील पेट्रोलियम पदार्थांपासून तयार होतात. कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे या कच्च्या मालाच्या किमतीतही मोठी वाढ होते, ज्याचा परिणाम कंपन्यांच्या उत्पादन खर्चावर होतो.
तेलाच्या संकटामुळे केवळ कच्चा मालच महाग होत नाही. तर कारखान्यांमधील वीज आणि ऊर्जेचा खर्चही वाढत जातो. तयार झालेली वाहनं, ट्रक्स किंवा जहाजांच्या माध्यमातून डीलरपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारा वाहतूक खर्चही इंधन दरवाढीमुळे वाढत जातो. या सर्व कारणांमुळे कंपन्यांवरचा आर्थिक बोजा वाढत जातो. जर तेलाच्या किमतीत झालेली वाढ ही अल्पकाळासाठी असेल, तर कंपन्या स्वतः काही काळ तोटा सहन करून किमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, जर हे युद्ध किंवा संकट दीर्घकाळासाठी चालू असेल आणि तेलाचे दर वाढलेलेच राहतील, तर कंपन्यांना गाड्यांच्या किमती वाढवणं भाग ठरतं.
तज्ज्ञांच्या मते, जर युद्धाची स्थिती गंभीर राहिली आणि तेलाचे दर वाढतच राहिले तर कार आणि बाईकच्या किमतीत 2 टक्क्यांपासून ते 10 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्व अंदाज तेलाचे दर किती वाढतात आणि ते किती काळ वाढून राहतात यावर अवलंबून असणार आहे. अशा संकटकाळात ग्राहकांच्या मानसिकतेतही बदल दिसून येतो. जेव्हा इंधन महाग होतं, तेव्हा लोक जास्त मायलेज देणाऱ्या गाड्यांना प्राधान्य देतात. यामुळे बाजारात छोट्या कार्स, CNG मॉडेल्स, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढू शकते. तर मोठ्या आणि जास्त इंधन पिणाऱ्या गाड्यांच्या विक्रीत घट होऊ शकते.






