आंध्र प्रदेशातल्या उंचच उंच शिखरांवर असलेल्या तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन अनेक सुंदर पहाडांचे रमणीय सौंदर्य न्याहाळत पाँडिचेरीला जाण्याकरिता निघालो. वास्तविक येथून पाँडिचेरी हा केंद्रशासित प्रदेश फक्त पाच- सहा तासांच्या अंतरावर आहे, हे तिरूपतीला आल्यानंतरच कळले. आज पाँडिचेरी ही महान योगी आणि तपस्वी महर्षि अरविंद घोष यांच्या नावाने आध्यात्मिकनगरी म्हणून ओळखली जाते. ४ एप्रिल १९१० ला ते ईश्वराच्या ‘आंतरिक आदेशा’वरून साधने करिता पाँडेचरीला आले. प्रचंड आर्थिक चणचण असतानाही अत्यंत हाल अपेष्टेत जमिनीवर झोपून दिवस काढलेत. फ्रान्सच्या ‘मीरा अल्फान्सा’ म्हणजे श्रीमाताजी या अरविंदांच्या अंतरंगी सहकारी आध्यात्मिक क्षेत्रातल्या उच्च कोटीच्या शिष्या होत्या. त्या फ्रान्सला राहत होत्या. एकमेकांना न बघताच त्यांच्यात आंतरिक, आध्यात्मिक आणि गूढ संपर्क प्रस्थापित झालेला होता. अज्ञात शक्तीने त्या महर्षींकडे आकर्षित झालेल्या होत्या. २९ मार्च १९१४ रोजी त्या फ्रान्सवरुन प्रथमच या आश्रमात आल्या आणि अरविंदांच्या अंतरंगी सहकारी शिष्य झाल्या. २४ एप्रिल १९२० ला त्या कायमच्यात पाँडेचेरीला राहायला आल्यात. त्त्यांना अरविदांमध्ये भगवान श्रीकृष्णाचे दर्शन व्हायला लागले. हा श्री अरविंद आश्रम त्यांनीच मरीन स्ट्रीट व्हाईट टाऊन येथे २४ नोव्हेंबर १९२६ या ‘सिद्धि दिवशी’ स्थापन केला आणि भारतात एक नवीन धार्मिकनगरी उदयाला आली. आजही या आश्रमात दोन हजारच्या वर साधक राहतात. येथे महर्षि अरविंदांची सुंदर आयतकृत समाधी असून सुंदर ताज्या फुलांनी ती रोज सजविली जाते. अनेक लोक समाधीवर डोके ठेऊन शांतचित्ताने स्वतःचे भान हरवून अक्षरश: मौनात बसलेले असतात. आज महर्षि अरविंद आश्रमाला जागतिक वलय निर्माण झाले आहे. आध्यात्मिक शांतीसाठी सार्या जगातून येथे पर्यटक, शिष्यगण येत असतात. वर्षभर हे व्हाईट टाऊन पर्यटकांनी फुललेले असते. येथील अनेक पर्यटन स्थळांपैकी काही अंतरावर असलेले “आरोव्हिल्ला” हे प्रचंड मोठा ‘गोल्डन बॉल’ असलेले केंद्र हे येतील प्रमुख आकर्षण आहे. या सोनेरी वर्तुळाकार गोलाच्या आतून एका विशिष्ट ठिकाणावरून बघितले असता संपूर्ण ब्रम्हांडाचे विलोभनीय दर्शन होते. हेच बघण्याकरिता पर्यटक येथे येत असतात. या ठिकाणी जगातल्या बहुतेक सर्वच देशांची माती एकत्र केलेली असून ‘वसुधैव कुटुंबकम’चे हे एक उत्तम उदाहरण आहे. येथील रॉक बिचच्या संग्रहालयात चोळ राजसत्तेच्या सुरुवातीपासून, मध्य काळाच्या आणि अंतिम काळाच्या अनेक मूर्ती आहेत. त्यात फ्रेंच काळातील आणि १५ ते १९ व्या शतकातील शस्त्रे, भाले, तलवारी, छपाई यंत्र, अनेक प्रकारच्या दगडांचे नमुने, चित्रकला, राज्यपालांचे टेबल, मोठया खुर्च्या, आकर्षक आरसे, पलंग बघून आपण भूतकाळचा भाग होतो.
महर्षि योगी अरविंद येथे येण्यापूर्वीच फ्रेंच लोकांच्या अनेक वसाहती येथे स्थापन झालेल्या होत्या आणि त्या सुंदर विशाल समुद्रातीरावरच्या आकर्षक आर्किटेक्चरच्या जुन्या इमारती, भव्य चर्च आजही मोठ्या डौलाने उभे आहेत. म्हणूनच पाँडिचेरीला “भारताचे फ्रान्स” म्हटल्या जाते. भारतीय आणि फ्रेंच संस्कृतीचा, स्थापत्य कलेचा येथील इमारतींमध्ये आकर्षक संगम बघायला मिळतो.
पहिल्या आणि दुसर्या शतकात सागरकिनार्यावरचे रोमन उत्पादनाचे हे प्रमुख व्यापारी केंद्र होते. या प्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित करण्याकरिता इंग्लंड आणि फ्रांस यांच्यात अनेक युद्धे झालीत. दक्षिण भारतातल्या इतिहासात गाजलेल्या पल्लव, चोळ, पांड्य, विजयनगर, ‘मदुराई सल्तनत’ या सर्व सत्तांनी पाँडिचेरीवर राज्य करून आपली अमित छाप सोडली. पण या साम्राज्याला खरी ओळख दिली ती फ्रान्सच्या राज्यकर्त्यांनी आणि पाँडेचरी हे खेडे खर्या अर्थाने प्रकाश झोतात आले. हे शहर समुद्री व्यापाराकरिता अत्यंत सोयीचे असल्याने आणि फ्रेंचांनी या शहराच्या विकासात प्रचंड “इंट्रेस्ट” घेतला आणि पाँडेचरीवर जवळपास ताबा मिळविला. १६७३ मध्ये फ्रांसिस ईस्ट इंडिया कंपनीने येथे एका व्यापारी केंद्राची एका ‘चौकी’च्या रूपाने स्थापना केली. डच आणि ब्रिटिश कंपन्यांनी भारतासोबत व्यापार सुरू केला. गव्हर्नर ‘फ्रंकोसिस मरीन’ यांनी या लहानशा खेड्याला मोठ्या समुद्री बंदरात परावर्तीत केले आणि फ्रेंच वसाहतीला या समुद्री किनार्यावर प्रारंभ झाला. जवळपास १४० वर्षे फ्रेंच राज्यकर्त्यांनी पाँडिचेरीवर निर्विवाद राज्य केले. पण राज्यसत्ता टिकविण्याकरिता करिता फ्रेंच राज्यकर्त्यांना ब्रिटीशांसोबत अनेक युद्धे करावी लागली आणि १९६३ ला हा केंद्रशासित प्रदेश झाला.
अशा या पाँडिचेरीला योगी अरविन्दांच्या योग सामर्थ्याचा परिसस्पर्श झाला. ‘क्रांतिकारक ते योगी’ हा त्यांच्या जीवनातला प्रवास अत्यंत विस्मयकारक आहे. १५ ऑगस्ट १८७२ ला कलकत्यात जन्मलेल्या अरविंद घोषांच्या वडिलांचे नाव होते डॉ.कृष्णधन घोष आणि आईचे नाव स्वर्णलता. वडील मेडिकलची पदवी घेण्याकरिता इंग्लंडला गेले आणि दोन वर्षानी एम.डी.ची पदवी घेऊन ते अक्षरश: इंग्रज बनुनच आले. इंग्लिश फॅशनने त्यांना इतकी भुरळ घातली की त्यांनी मुलांना भारतीयांसोबत बोलायला बंदी घातली. ते एक विचित्र वेड होते, त्यामुळे अरविंदाना शिकायला सेंट पॉल स्कूल लंडनला पाठविले. १८७९ ते १८९२ ही चौदा वर्षे त्यांनी इंग्लंडमध्ये घालवली. अरविंदांनी आयुष्यात कधी मौज मजा केली नाही. ते अत्यंत कमी बोलत. दरमहा दोनशे रुपये पगारावर त्यांनी बडोदा येथे सयाजीराव गायकवाड यांच्याकडे नौकरी केली आणि त्यांना अनेक भाषणे लिहुन दिली. भारतातल्या राजकीय चळवळींचे आणि स्वातंत्र्य युद्धाचे ते सखोल चिंतन आणि निरीक्षण करत असत. त्याकाळातील तत्कालीन परिस्थिती, देशकार्याची कार्यपद्धती राजकीय चळवळ या सर्वांचा त्यांनी सांगोपांग अभ्यास केला आणि स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी उडी घेतली. संस्कृत, बंगाली, मराठी, गुजराती या भाषा त्यांनी लवकरच आत्मसात केल्या. सोंग्स टु मिर्टिला, प्रेम आणि मृत्यू हे काव्य लिहुन जगप्रसिद्ध “सावित्री” हा पहिलं तर्जुमा लिहला.
पण देशप्रेम त्यांना स्वस्थ बसु देईना. ‘क्रांतिने स्वातंत्र्य’ हा विचार प्रबळ होत गेला १९०२ मध्ये ते बंगालमध्ये गेले. बंदुकीने ते नेमबाजी शिकले. बंगालमध्ये मित्रांसोबत सहा क्रांतिकारक केंद्रे स्थापन केली. अनेक क्रांतिकारक गटांना त्यांनी एकत्र करून त्यांचे संघटन बांधले. एका हातात तलवार आणि एका हातात गीता घेऊन “कोणतीही किंमत देऊन, काहीही झाले तरी भारतजननीला इंग्रजांच्या तावडीतुन मुक्त करावयाचे” अशी शपथ त्यांनी घेतली. बंगालच्या फाळणीच्या काळात त्यांनी ‘भवानी मंदिर’ नावाचे लहानसे पुस्तक लिहुन देशभर वितरित केले. अशा प्रकारे ते ब्रिटीशांच्या विरोधातले भारताचे महान क्रांतिकारक झाले आणि भारतात एक जहाल पक्ष जन्माला आला. पण या क्रांतिकारकांवर ब्रिटिश सरकारचा डोळा होता. २ मे १९०८ ला पहाटे श्रीअरविंद झोपत असताना ब्रिटिश पोलिसांनी हातात बंदुका घेऊन त्यांना अटक केली आणि अलिपुरच्या तुरुंगात त्यांची रवानगी केली. एका लहान अंधार्या कोठडीत एकांतवासात त्यांच्या राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करण्यात आली.
हाच त्यांच्या जीवनातला “टर्निंग पॉइंट” ठरला. येथे त्यांनी योगाभ्यास सुरू केला. गीता आणि उपनिषदे वाचून ते गहन ध्यान करण्यात गढून गेले. शारीरिक आणि मानसिक क्लेश भोगावे लागत असतानाही अंतरीच्या परमेश्वराची आराधना केली. आतुरतेने आणि तीव्रतेने देवाचा धावा केला. त्याच वेळेस त्यांना करावासाचे जीवन संपल्याची अनुभूति आली. भगवंतांनी एका क्षणात अंतरात्म्याला शक्ति दिली. तुरुंगाच्या आवारात फिरत असताना ते भिंतीकडे बघू लागले. त्याच वेळेस त्यांना एक अद्भुत अनुभव आला. अवतीभवती सर्वत्र वासुदेव कृष्ण दिसु लागले. वृक्षांमध्ये कृष्ण… झोपताना कृष्ण… ते पूर्णतः कृष्णमय झाले..! न्यायालयातही त्यांना कृष्णाचे दर्शन होत असे. तुरुंगात प्रत्यक्ष भगवान वासुदेव कृष्णाने त्यांना दर्शन दिले होते. वासुदेव सतत त्यांच्यासोबत राहत असे. ५ मे १९०९ ला त्यांना तुरुंगातून सोडण्यात आले.
१९०७ साली सूरत येथे झालेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. पण नंतर राजकीय निवृत्ती घेतली. जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोण पार बदलून आध्यात्मिक जीवन आणि साक्षात्कार यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून विश्वव्यापी ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवले. अंतरात्म्याने २४ नोव्हेंबर १९२६ या दिवशी श्रीअरविंदांच्या प्रचंड आध्यात्मिक कार्याचा “क्रांतिकारक ते योगी” हा प्रवास सुरू झाला आणि ते एकांतवासात गेले. याच दिवशी माताजींच्या अधिपत्याखाली आश्रमाची स्थापना झाली.
५ डिसेंबर १९५० ला मध्यरात्री त्यांनी देह ठेवला. ९ डिसेंबरला आवारातल्या समाधीत त्यांचा तेज:पुंज देह ठेवण्यात आला आणि महर्षि अरविंद युगाची समाप्ती झाली. माताजींचीही समाधी जवळच आहे. अशी ही अरविंदांची पाँडिचेरी आणि ‘भारताचा फ्रान्स’..! “क्रांतिकारक ते योगी” हा विस्मयकरक प्रवास.
– श्रीकांत पवनीकर
sppshrikant81@gmail.com






