फोटो सौजन्य - Social Media
वाशिम : कृषी विज्ञान केंद्र, वाशिम यांच्या वतीने करडा येथील गजानन महाराज मंदिर परिसरात खरीप हंगामपूर्व मार्गदर्शन व रासायनिक खतांचा संतुलित वापर या विषयावर शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्राला परिसरातील शेतकरी, ग्रामीण युवक-युवती, महिला बचत गटांच्या सदस्यांसह कृषी व पशुसखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर. एल. काळे उपस्थित होते. यावेळी कृषी विज्ञान तज्ज्ञ तुषार देशमुख आणि गृह विज्ञान तज्ज्ञ शुभांगी वाटाणे यांनी उपस्थितांना विविध कृषी विषयांवर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. आर. एल. काळे यांनी रासायनिक खतांचा असंतुलित वापर मातीच्या सुपीकतेवर तसेच मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करत असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी मृदा परीक्षणाच्या आधारे खतांचा वापर करणे आवश्यक असून, सेंद्रिय आणि जैविक खतांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच एकात्मिक पोषण व्यवस्थापनाचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी करण्यासह जमिनीचे आरोग्य जपता येऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. काळे यांनी पुढे सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शेतीकडे उद्योग म्हणून पाहण्याची वेळ आली आहे. बदलत्या हवामानाचा आणि वाढत्या उत्पादन खर्चाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी वैज्ञानिक शेती पद्धती स्वीकारणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कृषी विज्ञान तज्ज्ञ तुषार देशमुख यांनी खरीप हंगामातील प्रमुख पिके असलेल्या सोयाबीन, तूर, कापूस तसेच इतर पिकांसाठी शिफारस करण्यात आलेल्या खत व्यवस्थापनाविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी प्रमुख अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या संतुलित वापराचे महत्त्व पटवून दिले. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खतांचा वापर केल्यास उत्पादन वाढीसोबतच उत्पादन खर्चातही बचत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी माती परीक्षणाचे महत्त्व, एकात्मिक पोषण व्यवस्थापन, रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर आणि जमिनीची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांनी नियमितपणे माती परीक्षण करून त्यानुसार खत व्यवस्थापन करावे, असे आवाहन करण्यात आले. गृह विज्ञान तज्ज्ञ शुभांगी वाटाणे यांनी कृषी विकासामध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. ग्रामीण महिलांनी पोषण बागांची निर्मिती, सेंद्रिय खतनिर्मिती तसेच कृषिपूरक उद्योगांमध्ये सहभाग वाढविल्यास कुटुंबाच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले. शाश्वत शेतीसाठी महिलांचा सहभाग आणि कौटुंबिक पातळीवरील विविध उपक्रमांची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
चर्चासत्रादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. शेतीतील वाढता खर्च, खतांचा योग्य वापर, पिकांचे पोषण व्यवस्थापन आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतीतील आव्हाने याबाबतही चर्चा झाली. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन शुभांगी वाटाणे यांनी केले. यावेळी कल्याणराव देशमुख, झनकराव देशमुख, किशनराव देशमुख, दीपक देशमुख, कृषी सखी शारदा देशमुख, स्वाती देशमुख, व्यंकटराव देशमुख, नारायणराव जाधव, सुचिता देशमुख यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्चासत्रामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर उपयुक्त मार्गदर्शन मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.






