(फोटो- सोशल मिडिया)
Ethanol Petrol Impact: मध्य पूर्वेमध्ये सध्या सुरू असलेल्या तणावाचे पडसाद अनेक देशांमध्ये उमटत आहेत. भारताचा विचार केला तर सध्या या परिस्थितीचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर तसेच त्यांच्या किमतींवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. मागच्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये अनेकदा वाढ झाल्याचे दिसून आलं. या सगळ्याचा परिणाम म्हणून यावर उपाय शोधण्यासाठी भारत सरकार इथेनॉल-मिश्रित पेट्रोलचा विशेषतः ‘E20’ इंधन मार्केटमध्ये आणत आहे. या उपक्रमामुळे कच्च्या तेलाची आयात कमी होण्यास, परकीय चलनाची बचत होण्यास आणि शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास मदत होईल, असा सरकारकडून विश्वास व्यक्त केला जात आहे; पण अनेक वाहनधारकांमध्ये विशेषतः जुन्या पेट्रोल गाड्या आणि दुचाकी चालवणाऱ्यांमध्ये आता चिंता वाढत चालली आहे. यासगळ्याचा गाड्यांवर विपरित परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. केलेल्या सर्वेक्षणात नेमकं काय जाणवलं ? समजून घेऊयात.
करोडोंचे मालक असूनही कोट्यवधींचे कर्ज! तरीही देशातील तिसरे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री Siddaramaiah !
सर्वेक्षणाबाबत बोलायचे झाल्यास, ‘LocalCircles’ ने नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेमध्ये समोर आलं की, २०२२ किंवा त्यापूर्वी खरेदी केलेल्या पेट्रोल वाहनांच्या दर १० वाहनांपैकी साधारणपणे ५ मालकांनी असे नमूद केले आहे की, E20 पेट्रोलचा वापर सुरू झाल्यानंतर त्यांच्या वाहनाचे मायलेज कमी झाले आहे. या सर्वेक्षणामध्ये २४,००० हून अधिक वाहन मालकांची मतं जाणून घेतली गेली होती. सर्वेक्षणानुसार, ज्यांनी मायलेज कमी झाल्याची तक्रार केली, त्यापैकी साधारणपणे २५ टक्के लोकांनी असे सांगितले की, त्यांच्या वाहनाचे मायलेज २० टक्क्यांहून अधिक प्रमाणात घटले आहे. दरम्यान, ७ टक्के लोकांनी १५ ते २० टक्क्यांची घट नोंदवली आहे, तर १३ टक्के लोकांनी १० ते १५ टक्क्यांची घट झाल्याचे सांगितले.
ही आकडेवारी सध्या प्रामुख्याने चर्चेचा विषय बनली आहे; याचे महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारने यापूर्वी असं विधान केले होते की, E20 पेट्रोलचा मायलेजवर तसा फारसा परिणाम होणार नाही. विविध अंदाजांनुसार, मायलेजमध्ये केवळ १ ते ६ टक्क्यांची घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती; पण यापेक्षा विपरीत परिणाम होताना दिसत आहे. अनेक वापरकर्ते आता असा अनुभव सांगत आहेत की, प्रत्यक्ष वाहन चालवण्याच्या परिस्थितीत त्यांना यापेक्षा कितीतरी अधिक मोठा फरक जाणवत आहे. परिणामी, हा मुद्दा पुन्हा पुन्हा चर्चेला येणारा एक विषय बनून राहिला आहे.
२०२३ पूर्वी खरेदी करण्यात आलेली अनेक पेट्रोल वाहने ही कमी इथेनॉल मिश्रण असलेल्या इंधनावर जसे की E5 किंवा E10 चालण्यासाठीच तयार करण्यात आली होती. याचा परिणाम म्हणून, E20 पेट्रोलचा वापर केल्यास जुन्या इंजिनांवर त्याचा तीव्र परिणाम होऊ शकतो. तज्ञांच्या मते, नेहमीच्या पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉलची energy density ही कमी असते. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, तेवढेच अंतर कापण्यासाठी वाहनाला इंधनाची अधिक प्रमाण लागू शकते. शिवाय, दीर्घकाळापर्यंत वापर केल्यास, इथेनॉलमुळे जुन्या वाहनांमध्ये आढळणाऱ्या रबर आणि प्लास्टिकच्या घटकांचंही मोठं नुकसान होऊ शकतं.
या सर्वेक्षणामध्ये केवळ मायलेजशी संबंधितच नव्हे, तर वाहनांवरही याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यांच्यात बिघाड होण्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. सुमारे २९ टक्के प्रतिसादकर्त्यांनी असे नमूद केले की, E20 पेट्रोलचा वापर केल्यानंतर त्यांना इंजिन, फ्युएल लाइन, कार्बोरेटर किंवा इतर सुट्या भागांशी परिणाम होत आहे. पण हे दावे केवळ वाहन मालकांच्या अनुभवांवर आधारित आहेत; हा कोणताही वैज्ञानिक अभ्यास नाही किंवा सरकारने नियुक्त केलेले संशोधनही नाही. असे असले तरी, या बाबींमुळे E20 पेट्रोलबाबत जनतेमध्ये वाढत असलेल्या चिंतेत भर पडत असल्याचे दिसून येत आहे.
भारत आपल्या कच्च्या तेलाच्या एकूण गरजेपैकी सुमारे ८७ टक्के तेल परदेशातून आयात करतो. परिणामी, सरकार ‘इथेनॉल मिश्रण’ या उपक्रमाकडे एक दीर्घकालीन धोरणात्मक पाऊल म्हणून पाहते आहे. यामागील मुख्य उद्देश तेलाची आयात कमी करणे, परकीय चलन वाचवणे आणि ऊस व मका उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे हा आहे. सरकारने आपले E20 चे उद्दिष्ट नियोजित वेळेपूर्वीच साध्य केले आहे; आणि आता भविष्यातील अंमलबजावणीसाठी—E22, E25, E30, आणि काही प्रसंगी E85 सारख्या इथेनॉलचे प्रमाण अधिक असलेल्या इंधनांचे विकासकार्य हाती घेतले आहे.
वाहन मालकांसाठी सर्वात महत्त्वाची चिंता ही आहे की, जर इंधनाची मायलेज कमी झाली, तर पेट्रोलवरील त्यांचा मासिक खर्च वाढणारच आहे. शिवाय, जर वाहनांच्या देखभालीचा खर्चही वाढला, तर जुन्या पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करणे हे, पूर्वीच्या तुलनेत, खूपच अधिक खर्चिक ठरू शकते.






