(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इराणकडून २० लाख बॅरल कच्चे तेल घेऊन आलेले एक जहाज गुजरातच्या बंदरात पोहोचले आहे. मात्र, भारताने हे तेल स्वीकारण्यास आणि ते जहाजातून उतरवण्यास सध्या नकार दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. जागतिक स्तरावर सुरू असलेला भू-राजकीय तणाव आणि आर्थिक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या या पावलाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इराणचे हे विशाल तेलवाहू जहाज गुजरातच्या किनारपट्टीवर दाखल झाले आहे. यामध्ये सुमारे २० लाख बॅरल कच्चे तेल आहे. भारत आपल्या गरजेसाठी मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून असतानाही, या जहाजाला माल उतरवण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या सध्याच्या तेलाच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर, नुकताच इराणहून एक तेलवाहू जहाज गुजरातमध्ये दाखल झाला; या जहाजावर सुमारे २० लाख बॅरल्स कच्च्या तेलाचा साठा होता पण त्याच्या आगमनाची कोणालाही पुसटशीही कल्पना नव्हती. या संदर्भात, द इंडियन एक्सप्रेसच्या एका अहवालात याबाबत अत्यंत महत्त्वाची बाब सांगितलं आहे.
भारतातील तेल शुद्धीकरण कंपन्या (रिफायनर्स) हे तेलवाहू जहाज स्वीकारण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. याचे कारण असे की, या तेलाच्या खेपेबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही विशेषतः, हे तेल कोणी खरेदी केले, त्याचा मूळ स्रोत कोणता आणि अशाच स्वरूपाचे इतर तपशील पूर्णपणे अज्ञात आहेत.
भारत सरकारने अधिकृतपणे अद्याप यावर सविस्तर भाष्य केलेले नाही. मात्र, भारताचे परराष्ट्र धोरण नेहमीच आपल्या ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देणारे राहिले आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या वेळीही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली होती. मात्र, इराणच्या बाबतीत इस्रायलसोबतचे संबंध आणि अमेरिकेचा दबाव या गोष्टींचा विचार करून भारत हा निर्णय घेत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याबाबत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.






