(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
गेल्या आठवड्यात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी चांगला ठरला. ३०-शेअर असलेला BSE Sensex ४,२३०.७ अंकांनी, म्हणजेच ५.७७ टक्क्यांनी वधारला, तर NSE Nifty देखील १,३३७.५ अंकांनी, म्हणजेच ५.८८ टक्क्यांनी उसळला. विश्लेषकांनी असा अंदाज वर्तवला आहे की, पाकिस्तानमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चेचा अनिर्णित निकाल सोमवारी म्हणजेच १३ एप्रिलला शेअर बाजार उघडल्यावर गुंतवणूकदारांचं मत बदलू शकतं.
विश्लेषकांच्या मते, पश्चिम आशियातील घडामोडी तसेच कच्च्या तेलाच्या किमती, १३ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात बाजाराची दिशा ठरवणार आहेत. मंगळवारी म्हणजेच १४ एप्रिलला डॉ. भीमराव आंबेडकर जयंतीनिमित्त बाजार बंद राहणार असल्याने हा आठवडा अल्प सुट्टीचा असणार आहे. त्यामुळे गणितं कशा प्रकारे बदलतील हे पाहूयात
एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने रविवारी स्पष्ट केलं की, अमेरिकेच्या बाजूने केलेल्या अवाजवी मागण्यांमुळे कोणतीही वाटाघाटी न होता चर्चा संपली. पण, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकाई म्हणाले की, राजनैतिक वाटाघाटी कधीच संपत नाहीत. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स हेही म्हणालेत की, इराणने आपला अणुकार्यक्रम मागे न घेतल्यामुळे शांतता करार होऊ शकला नाही. दरम्यान, इराणी बाजूने सांगितले की, काही मुद्द्यांवर सहमती झाली, परंतु २ ते ३ महत्त्वाच्या मुद्द्यांवर मतभेद कायम आहेत.
लाइव्हलाँग वेल्थचे संशोधन विश्लेषक, हरिप्रसाद के म्हणाले की, निफ्टी ५० सध्या एका नाजूक वळणावर आहे. २४,००० चा टप्पा पुन्हा गाठल्यानंतर बाजारात सावध आशावाद दिसत होता, परंतु चर्चा अयशस्वी झाल्यामुळे नजीकच्या काळातील दृष्टिकोन बदलला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, कोणताही तोडगा न निघता चर्चा संपल्यास, संघर्षाच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिसलेल्या अस्थिरतेप्रमाणेच बाजारात पुन्हा अस्थिरता निर्माण होऊ शकते. त्यांच्या मते, सोमवारी प्रमुख निर्देशांक घसरणीसह उघडू शकतात.
या आठवड्यात, महागाईची आकडेवारी, कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या हालचालींचा बाजारावर प्रभाव पडणार आहे. रेलिगेअर ब्रोकिंगचे संशोधन प्रमुख अजित मिश्रा यांनी स्पष्ट केलं की, गुंतवणूकदार विप्रो, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांसारख्या प्रमुख कंपन्यांच्या निकालांवर लक्ष ठेवून असतील. याशिवाय, १३ एप्रिल रोजी ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच CPI आणि १४ एप्रिल रोजी घाऊक किंमत निर्देशांक म्हणजेच WPI यांची आकडेवारी जाहीर केली जाईल, ज्यामुळे महागाईचा कल लक्षात येईल. त्यामुळे या सगळ्याचा आता बाजारावर कसा परिणाम होतोय.






